सातारा पालिकेची निवडणूक महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढवणार
प्रतिनिधी/ सातारा
पाच वर्ष माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजाला कितपत न्याय देण्याचा प्रयत्न केला?, फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय शरद पवारांच्या हातात आहे का? असे सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित करून अर्णव गोस्वामी सुटू शकतो मग केंद्राने मराठा समाजाला आरक्षण द्यायला अडचण काय आहे, अशी टिप्पणी भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शशिकांत शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वच पक्षांनी निर्णय घ्यावा. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सर्वांची भूमिका प्रामाणिक असावी असे माझे मत आहे. पवार साहेबांच्यावर टीका करून जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. काही लोकांना पुढे करून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न विनाकारण सुरू आहे. मागच्या कालावधीत बीजेपीने सर्व संस्था मोडीत काढल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले. समाजाचे राजकारण आपल्या बाजूने करून देशात अस्थिरता करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. पाच वर्ष फडणवीसांच्या सरकारने मराठा समाजाला कितपत न्याय देण्याचा प्रयत्न केला?, असा खोचक सवाल करत आमदार शिंदे म्हणाले, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. भाजपच्या काळातील तेच अजून आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाले तर प्रश्न सुटेल का?, अर्णव गोस्वामी सुटू शकतो मग केंद्राने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, केंद्रातील नेत्यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा. सुप्रीम कोर्टाचा निर्णय शरद पवारांच्या हातात आहे का?, मराठा आरक्षणाचा एकमताने निर्णय घेतला तर सुप्रीम कोर्टही स्थगिती उठवेल, असे सांगत देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात मराठा मोर्चा आम्ही काढला. बारामातीला धनगर समाजाचा मोर्चा काढला. पण समाजामध्ये अस्थिरता निर्माण करायचे आणि आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न बीजेपी करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
वकिलाने बाजू मांडण्यासाठी उपस्थित न राहण्याचे फडणवीसांनी सांगितले असल्याचा आरोप करण्यात आला. पुढे शिंदे म्हणाले, कूटनितीमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला डाग लागू नये. भाजप काय करू शकते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. उदयनराजेंनी मराठा समाजाचे नेतृत्व करायला हरकत नाही पण ते का करत नाहीत, कोणाच्या सांगण्यावरून हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे का?, असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटलांनी केंद्रात जाऊन पुढाकार घ्यावा आणि राजकारण विरहित आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे, अशी टिप्पणी आमदार शिंदे यांनी केली.
सातारा पालिकेत राष्ट्रवादी निवडणूक लढवणार
महाविकास आघाडीतून सातारा पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे, असे सांगत आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेच्या बाबतीत पक्ष पातळीवर जो निर्णय होईल त्यावर जिल्हा बँक निवडणुकी संदर्भात निर्णय घेतला जाईल. सहकारामध्ये पक्षीय रंग द्यायचा नाही पण, जिह्यातील वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील, प्रशासक बॉडी आहे. त्यामुळे लगेच निर्णय नाही, बँकेत पक्ष विरहित निवडणूक होण्यासाठी बरेच मंडळी आहेत असे त्यांनी सांगितले.