वाहनधारकांची कसरत : दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून काही रस्त्यांवर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. नेमका रस्ता कुठे? अशी स्थिती काही भागात निर्माण झाली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टिळकवाडी, सुभाषचंद्रनगर परिसरातील रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टिळकवाडी भागातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. तसेच काही ठिकाणी पेव्हर्स घालून सुसज्ज रस्ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुभाषचंद्रनगर परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीने कानाडोळा केला आहे. येथील रस्ता पूर्णपणे निकामी झाला असून सर्वत्र खड्डेच खड्डे बनले आहेत.
या खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने पादचाऱयांनादेखील ये-जा करणे मुश्कील बनले आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी माती घालण्यात आली होती. पण पावसामुळे मातीदेखील वाहून गेली असून संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे. खड्डे आणि चिखलाच्या विळख्यात अडकलेल्या रस्त्यावरून वाहनधारकांना व पादचाऱयांना ये-जा करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथील रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.