वार्ताहर/ मौजेदापोली
दापोलीत हळूहळू पर्यटकांचा लोंढा वाढीस लागला आहे. मात्र 2 दिवसांपूर्वीच पाळंदे समुद्रकिनाऱयावर महाड येथील दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. त्यातच रविवारी पर्यटकांना सुरक्षिततेचा ‘सल्ला’ देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांनाच अरेरारी करण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे येथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.
पाळंदे समुद्रकिनाऱयावर रविवारी पुणे येथील आलेले पर्यटक पोहायला जात होते. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी घडल्या घटनेचे कथन करून धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला. तरीही पर्यटक त्याच धोक्याच्या ठिकाणी पोहत होते. शनिवारी पर्यटक बुडाले, त्या दिवशी अमावस्येची समुद्राला मोठी भरती होती. दुपारी 1:30 च्या दरम्यान ही घटना घडली होती. अमावस्या असली की सलग 3 दिवस समुद्राला मोठी भरती असते. येणाऱया पर्यटकांना या बाबत काहीही माहिती नसते. तरीही स्थानिकांकडून देण्यात येत असलेल्या महितीकडे दुर्लक्ष करून अरेरावी आणि दादागिरी करून समुद्रात पोहायला जातात. असाच प्रकार रविवारी सकाळी घडला. ज्या ठिकाणी पर्यटक बुडण्याची घटना घडली, त्याच ठिकाणी काही पुण्याचे पर्यटक पोहत होते. ग्रामस्थांनी अनेकवेळा मज्जाव करूनही हे पर्यटक ऐकले नाहीत. अशाच येथे सुरक्षारक्षकाची नेमणूक नसल्याने अशा प्रकारांना आळा घालणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लॉकडाऊननंतर आता पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अशा काही घटना घडल्याने स्थानिक ग्रामस्थांना आपले उद्योग सांभाळत पर्यटकांना जीव वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागते. यामुळे हर्णै ग्रामपंचायतीकडून पाळंदे बीचवर पोहण्यासाठी जो भाग धोकादायक आहे तेथे सूचनांचा फलक लावून जीवरक्षकाची व्यवस्था लवकरात-लवकर करावी, अशी मागणी होत आहे. दापोलीतील अनेक समुद्रालगतच्या ग्रामपंचायतींनी सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. अशा ग्रामपंचायतींनी सुरक्षारक्षक नेमण्याविषयी पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच गावातील पोलीस पाटील यांनीही दक्षता बाळगणे गरेचे असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केले.