श्रीनगरमधील घटना – अन्य एकजण फरार, शोध सुरू
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गेल्या काही दिवसात सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षा दलावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. नुकताच श्रीनगरमधील नातीपोरा भागात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. यानंतर, प्रत्युत्तरादाखल, पोलीस दलाने एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. मृत दहशतवाद्याची ओळख पटली असून तो शोपियानचा रहिवासी होता. त्याचे नाव आकीब बशीर कुमार असे असून तो लष्कर-ए-तोयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता.
जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या सफाकदल भागात रात्रीच्यावेळी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकला. पण त्याच्या स्फोटात कोणीही मरण पावले नाही. त्यापूर्वी दहशतवाद्यांनी एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळय़ा घालून हत्या केली, ज्यात एका महिलेचाही समावेश होता. तत्पूर्वी मंगळवारी दहशतवाद्यांनी तीन वेगवेगळय़ा ठिकाणी तीन जणांची गोळय़ा घालून हत्या केली होती. काश्मीरमध्ये पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे.
दहशतवाद्यांविरोधात रणनीती ठरविण्यासाठी बैठक
काश्मीरमधील दहशतवादी कारवाया पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर शनिवारी शाह यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना दिल्लीला बोलावले होते. काश्मीरमध्ये सामान्य लोकांवर होणारे हल्ले लक्षात घेऊन त्यांना दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. गृहमंत्री सध्या गुजरात दौऱयावर असून तेथून परतल्यानंतर त्यांची बैठक लवकरच होणार आहे. मनोज सिन्हा शनिवारी सकाळी दिल्लीला दाखल झाले होते. दोन दिवसांपूर्वीच दोन शिक्षकांची हत्या झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी सहकाऱयांसमवेत सुमारे तीन तास बैठक घेतली होती. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृह सचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक अरविंद कुमार, बीएसएफचे महासंचालक पंकज सिंह, सीआरपीएफचे प्रमुख कुलदीप सिंह आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.