निवड निश्चित, तयारी सुरू : जयशंकर यांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य देश म्हणून भारताची निवड जवळपास निश्चित झाली आहे. अशी निवड आठव्यांदा होत आहे. आपल्या कार्यकाळात भारताने सुरक्षा परिषदेत 5 सूत्री कार्यक्रम क्रियान्वित करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा शुक्रवारी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी घोषित केली. ही निवडणूक 17 जूनला होत आहे.
प्रगतीच्या नव्या संधी शोधणे, आंतरराष्ट्रीय दहशतवादाला प्रभावी उत्तर शोधणे, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा यांच्यासंबंधी सर्वंकष धोरण, बहुराष्ट्रीय व्यवस्थेत सुधारणा करणे आणि समस्यांच्या समाधानासाठी मानवी संवेदनाक्षम तंत्रज्ञानाचा विकास, असा हा भारताचा पाचसूत्री कार्यक्रम असेल. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे सध्या जगाची आर्थिक स्थिती एका नाजूक वळणावर येऊन पोहचली आहे. ही स्थिती लक्षात घेता एका व्यापक आणि सर्वसमावेशक कार्यक्रमाची आवश्यकता असून भारताचा हा 5 सूत्री कार्यक्रम यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असा विश्वास एस. जयशंकर यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केला.