कार्यालयात येणाऱयांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा उदेक वाढत चालला आहे. तरीदेखील सरकारी कार्यालये सुरूच आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आता सरकारी कार्यालयांत गर्दी होतानाचे चित्र दिसून येत आहे. येथील आरटीओ कार्यालय जनतेला समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र, जनतेमध्ये अजूनही सोशल डिस्टन्सबाबत जनजागृती नाही. त्यामुळे खुद्द आरटीओ शिवानंद मगदूम हे कार्यालयाबाहेर पडून वारंवार रांगेत उभे राहिलेल्या व्यक्तींना सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना करत आहेत. दिवसांतून चार-पाच वेळा ते बाहेर पडून सूचना करतानाचे चित्र सध्या दिसत आहे.
कार्यालयाबाहेर जे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत त्यांची कामे थांबवा, असे येथील कर्मचाऱयांना त्यांनी सुनावले होते. मात्र, याचा कोणताच उपयोग नागरिकांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्याला भारतही अपवाद नाही. मात्र, बेळगाव येथील एक मुख्य कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱया आरटीओ (रस्ते वाहतूक कार्यालय) कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाले होते. यासाठी आरटीओ शिवानंद मगदूम यांनी मंगळवारी स्वतःहून नागरिकांना आवाहन करत नियमांचे पालन करण्याचे सांगितले. मात्र नागरिकांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. आवाहन करून गेल्यानंतर पुन्हा एकत्र येणाऱया नागरिकांना कोरोनाची भीती नसल्याचेच चित्र पाहावयास मिळाले.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर आरटीओ कार्यालयात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. वाहन परवाना काढणे, त्यासाठी अर्ज भरणे, परवान्यासाठी लागणारी फी भरणे, वाहनांची नोंद करणे यासह अनेक कामांसाठी नागरिक या ठिकाणी गर्दी करत होते. गर्दी न करता कामे करून घेण्याचे आवाहन आरटीओ शिवानंद मगदूम करत असले तरी नागरिकांवर याचा कोणताच परिणाम होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता आरटीओंनी खुद्द कार्यालयाबाहेर पडून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आरटीओ कार्यालय परिसरात मार्किंग करण्यात आले आहे. मात्र नियमांची पायमल्ली करण्यातच नागरिक धन्यता मानत आहेत. त्या मार्किंगमध्येच नागरिकांनी उभे राहून नियमांचे पालन करावे. याचबरोबर हा नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची कामे करून देऊ नका, असे अधिकाऱयांनी सांगितले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत असले तरी नागरिकांतून मात्र नियमांचे उल्लंघन होत आहे.