प्रतिनिधी/ फलटण
सुरवडी (ता. फलटण) येथील साखरवाडी- सुरवडी या रस्त्यालगत असणाऱया न्यू फलटण शुगर डिस्टलरी विभागांमध्ये शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे कंपनीच्या बॉयलरसाठी साठवून ठेवलेल्या बगॅसच्या गंजीला अचानक आग लागली व थोडय़ाच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंपनीचे मात्र सुमारे तीनशे ते चारशे टन बगॅस जळाल्याने अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. न्यू फलटण शुगर डिस्टलरी विभागात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने लागलेली आग विझवण्यासाठी बाहेरून अग्निग्नशामन दलाचे दोन बंब बोलावण्यात आले होते. सुमारे चार ते पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात अग्निग्नशामक दलाला यश आले.
डिस्टलरीतील बॉयलरसाठी साठवून ठेवलेल्या बगॅसच्या सुरक्षेसाठी व आग विझवण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असण्याची गरज असताना याठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना न्यू फलटण शुगर डिस्टलरी या कंपनीने केली नव्हती. अशा प्रकारच्या बगॅसच्या सुरक्षेसाठी काही नियम व अटी असताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नसल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असते. तसेच लगत असणाऱया पिकांचे अथवा मालमत्तेचे नुकसान ही होण्याची शक्यता असते. तरी अशा प्रकल्पास सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बगॅस ठेवण्यासाठी परवानगी कशी देण्यात आली हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या कंपनीमध्ये सुरक्षा व फायर सिस्टीम आहेत का याची चौकशी होण्याची गरज असून सुरक्षा व फायर सिस्टीम असल्यास फायर ऑडिट करण्यात आले आहे का तसेच सुरक्षा व फायर सिस्टीम कंपनीमध्ये होती तर बाहेरून अग्निग्नशामक बंब का बोलवण्यात आले यांची चौकशी होण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. यापूर्वी न्यू फलटण शुगर डिस्टलरी कंपनीच्या तक्रारी स्थानिक ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याबाबत संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असताना या आगीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून महसुल विभाग व प्रदूषण नियंत्रण विभाग यांनी यासंबंधी योग्य दखल घेऊन न्यू फलटण शुगर डिस्टलरी कंपनीच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.