कालव्याचा दरवाजाही उघडला
प्रतिनिधी/ मंडणगड
दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी बुधवारी दुपारनंतर पणदेरी धरणाची गळती रोखण्यात यश आले आहे. पाटबंधारे विभागासह एनडीआरफच्या पथकांनी दिवसरात्र काम करुन ही गळती थांबवली. त्यासाठी सांडवा धरणाची भिंत सुरुंग स्फोटाने फोडण्याबरोबरच कालव्याचा दरवाजाही पूर्णपणे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे पाणीपातळी कमी होत असून धरणाचा धोका तूर्तास टळल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
25 वर्षाच्या पणदेरी धरणाला सोमवारी सकाळपासून गळती लागल्याने पंचक्रोशीत घबराट पसरली. गेले दोन दिवस जिल्हय़ातील वरिष्ठ अधिकारी धरणावर ठाण मांडून होते. शंभरहून अधिक कामगारांना घेऊन गळती रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु होते. धरणाला धोका पोहचून पाण्याचा विसर्ग अधिक झाल्यास जीवितहानी होऊ नये याकरिता पणदेरी, बहिरीवली कोंडगाव या परिसरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना देत बाजारपेठ बंद केली होती. बुधवारी धरण परिसरात नागरिकांना बंदी केल्याने प्रशासनाला कामकाज करण्यात गती मिळाली. पावसाची कृपादृष्टी राहिल्यास पुढील आठ दिवसांत गळतीच्या ठिकाणी पिचिंगचे काम पूर्ण हेणार असल्याची माहिती उपअभियंता गोविंद श्रीमंगले यांनी दिली.
गळती रोखण्यासाठी 80 ट्रक मातीचा भराव
मंगळवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घटनास्थळी भेट दिली. बुधवारी सकाळपासून आमदार योगेश कदम व जिल्हाधिकारी मिश्रा पणदेरी धरणावर हजर होते. पाण्याच्या विसर्गासाठी सुरूंगाने 5 मीटर रुंद व दीड मीटर उंच एवढी भिंत फोडल्यानंतर पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात झाला. यामुळे मुख्य भिंतीवरील पाण्याचा दाब कमी झाल्याने गळती थांबविण्याच्या कामाला वेग आला. या दरम्यान गळतीच्या ठिकाणी माती भरलेल्या गोण्या भरण्यात आल्या. सुमारे 80 ट्रक मातीचा भराव करण्यात आला असून मुख्य भिंतीला लागलेली गळती थांबल्याचे दिसून आले.
कालव्याचा दरवाजा उघडून विसर्ग
कोल्हापूर येथून आलेल्या पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाच्या पथकाने कालव्याद्वारे पाणी सोडण्यास तांत्रिक बाबींची पडताळणी केली. त्यानंतर कालव्याचा दरवाजा पहिल्या टप्प्यात काही अंशी उघडण्यात आला. कालव्यातून स्वच्छ प्रवाह पाहून सुटकेचा निश्वास सोडला. दरवाजा उघडताना गळतीमुळे धरणाच्या भिंतीला धोका उद्भवणार नाही याची खात्री झाल्याने दुपारनंतर हा दरवाजा 75 टक्के उघडण्यात आला आहे. दोन्ही बाजूनी पाण्याचा 2 क्यूब प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू केल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीतील गळती थांबून धोका कमी झाला आहे.
पंधरा दिवसांत धरण रिकामे होणार
गळतीवेळी भिंतीमधून 0.2 क्यूब.मी./सेकंद पाणी बाहेर पडत होते ते पूर्णपणे बंद झाले असून आता कालव्यातूनच पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात 4 दशलक्ष घनमीटर पाणी होते. त्यातील सुमारे 1 दशलक्ष घनमीटर पाणी कमी झाले असून पाऊस न झाल्यास पुढील पंधरा दिवसांत धरणातील पाणीसाठा रिकामा होणार आहे. त्यामुळे धरण फुटीचा संभाव्य धोका सध्या टाळला आहे.
प्रशासनाच्या अथक प्रयत्नाला यश;
दोन दिवस पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता सुजित पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले, स्थापत्य अभियंता बळवंत पवार, पुणे येथील 5 बटालियन एनडिआरएफचे सारंग कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जवानांचे पथक, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मंडणगड पोलीस निरीक्षक संजय आंब्रे, बाणकोट पोलीस निरीक्षक उत्तम पीठे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे, पोलीस ठाण्याची संपूर्ण टीम यासाठी मेहनत घेत होते.
स्थलांतरित नागरिकांची व्यवस्था
मंगळवारी स्थलांतर केलेल्या नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात आली होती. तेथील सोयीसुविधांच्या अभावामुळे हे नागरिक बुधवारी पणदेरी बौद्धवाडी येथे दोन घरामध्ये हलवण्यात आले आहेत. मंगळवारी संपूर्ण दिवस प्रशासनाच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आल्याने प्रशासनाने ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रेशन, गॅस शेगडी व जेवणाचे साहित्य उपलब्ध करुन दिले.