वार्ताहर/ हुक्केरी
सुलतानपूर ग्राम पंचायत निवडणुकीच्या वादातून ग्रा. पं. सदस्यपदी निवडून आलेले शानूरसाब दस्तगीर मुल्ला यांचा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे गावात अद्याप तणावाचे वातावरण असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस खात्याच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सुलतानपूरला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सुलतानपूर येथे ग्रा. पं. निवडणुकीमध्ये दोन गट पडले होते. त्यामुळे निकाल लागल्यानंतर गावात कोणीही मिरवणूक काढायची नाही अशी सक्त ताकीद पोलिसांकडून दोन्ही गटाला देण्यात आली होती. त्यामुळे गावात मिरवणूक काढण्यात आली नाही. मात्र शानूरसाब यांनी आपल्या समर्थकांसह बस्सापूर याठिकाणी मिरवणूक काढून जल्लोष केला. याची माहिती विरोधकांना कळताच त्यांनी बस्सापूर गाठले. तेथे त्यांनी मिरवणूक काढायची नसताना का काढली, असा जाब विचारला. यावेळी झालेल्या वादावादीमध्ये शानूरसाब यांना दगडाने झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत या प्रकरणी 19 जणांवर गुन्हा नोंद झाला असून जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात पोलिसांनी अनेकांना चौकशीसाठी बोलावून घेतले असून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान आज शनिवारी या प्रकरणी आणखी काही जणांना अटक करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.