प्रतिनिधी /येळ्ळूर
सुळगे (ये.) येथील भावकेश्वरी मैदानावर महिला मेळावा व तिळगुळ समारंभाचे रविवार दि. 6 रोजी आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात सुमारे 500 महिलांनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळगे ग्रा. पं. अध्यक्षा गंगव्वा नाईक होत्या.
प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील यांच्या हस्ते शिव छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्या यमुताई पाटील आणि पद्मा पाटील व मान्यवर पाहुणे मंडळींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रूपा पाटील व नेहा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांचे शुभांगी पाटील यांनी स्वागत केले. शिक्षिका ऐश्वर्या गुरव, देसूर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, स्त्री सन्मानाचा हा सोहळा आहे. स्त्रियांना संघटित होऊन अशी संधी मिळत असते, तिचा सदुपयोग करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने विचारांवर विश्वास ठेवून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. मुलांना सुसंस्कृत घडविणे आईचे कर्तव्य आहे, असे सांगितले. त्यानंतर रूपा पाटील, यमुनाताई पाटील, गंगव्वा नाईक, नेहा पाटील, ऐश्वर्या गुरव, शुभांगी पाटील यांच्याहस्ते सर्व महिलांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए.पी. मंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.