कोविड-19 च्या सर्व नियमांचा सरकारला विसर : नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे सोयीचे ठरणार
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना गेला नाही तोपर्यंत ओमिक्रॉन दाखल झाला आहे. बेळगाव सुवर्णसौध येथे अधिवेशन घेताना कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन केले जाईल, या स्पष्टीकरणाचे विस्मरण सरकारलाच झाले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने दररोज येथे गर्दीमध्ये भर पडत असून एखाद्या जत्रेला व्हावी तशी गर्दी होत आहे.
सुवर्णसौध येथे अधिवेशन असताना काही अंतरावर आंदोलनकर्त्यांसाठी मंडप घातले जातात. सध्या या परिसरात 8 ते 10 हून अधिक मंडप आहेत. मुख्य म्हणजे या ठिकाणी एकाच मंडपात वेगवेगळय़ा संघटना आंदोलन छेडत बसलेल्या असतात. परिणामी सुवर्णसौध परिसरात गर्दीचा दररोज उच्चांक गाठला जात आहे.
मात्र त्याचे ना सरकारला गांभीर्य आहे, ना आंदोलनकर्त्यांना. येथे मास्क, मेटल डिटेक्टर यांचे नियम पोलीस सांगतात. मास्क घालून मेटल डिटेक्टरने तपासणी करून आत पाठवितात. परंतु एकाचवेळी शेकडो आंदोलनकर्ते आणि नागरिक आल्यास सर्व नियमांची पायमल्लीच होते. आंदोलनस्थळी फार मोजकेच आंदोलनकर्ते, कार्यकर्ते मास्क घालताना दिसतात.
विशेष म्हणजे काही महत्त्वाच्या आंदोलकांना पोलिसांनी सुवर्णसौधपर्यंत जाण्यास रोखल्यावेळी आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये बरीच झटापट झाली. यावेळी कोविड-19 च्या नियमांचे प्रत्येकालाच विस्मरण झालेले दिसते. आंदोलनकर्ते आंदोलन करतात. माध्यमांनी विचारल्यास संबंधित खात्याचे मंत्री येणार आहेत, असे खात्रीपूर्वक सांगतात. दुपारच्या जेवणाच्यावेळेला मंत्री येणार यावर ठाम असणाऱया आंदोलनकर्त्यांना सामोरे जाण्यासाठी फार क्वचितवेळा मंत्री येवून जातात. अन्यथा त्यांच्या खात्याचे सचिव, उपसंचालक व तत्सम अधिकारी पाठविले जातात.
….याचा फटका बेळगावकरांना बसू नये!
कोरोना गेलेला नाहीच. अद्यापही एक, दोन रुग्ण दररोज जिल्हय़ात आढळून येत आहेत. नियमांची पायमल्ली ही धोकादायक ठरू शकते. अजूनही आठवडाभर हे चित्र असेच असणार आहे. गर्दीत वाढ होणारच आहे. नियम पायदळी तुडविले जाणारच आहेत. परंतु पुढे त्याचा फटका बेळगावकरांना बसू नये, यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करेल, अशा भ्रमात न राहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे हे सोयीचे ठरणार आहे.