शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे आवाहन : बेळगावची दौड हिंदुत्वाची धर्मपंढरी : दुर्गामाता दौडची संभाजी चौक येथे सांगता
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवराय यांच्या सोबत संताजी, धनाजी, तानाजी, मुरारबाजी एकाच वेळी शत्रुशी लढले. त्यांनी आक्रमणे थोपविली. इंग्रजांना छातीवर घेतले. त्याचवेळी किल्ले, आरमार अशी नवनिर्मितीही केली. भगव्यापाशी नि÷ा ठेऊन आपण जसे जमलो आहोत तसेच आपले सामर्थ्य, योगदान, शक्ती, दातृत्व आणि अंगावर घेतलेल्या कर्तृत्वाची जोड लावून 32 मण सुवर्ण सिंहासनाच्या संकल्पपूर्तीसाठी झटायला हवे, असे आवाहन शिवव्याख्याते सौरभ करडे यांनी केले.
नवरात्रीनिमित्त 9 दिवस सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची सांगता बुधवारी संभाजी चौक येथे झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सौरभ करडे उपस्थित होते. डॉ. अमोल कोल्हे आणि करडे यांनी दौडमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात करडे यांनी हे मत व्यक्त केले.
ते म्हणाले, ज्याला हिंदुत्वाची धर्मपंढरी पाहावयाची आहे त्याने बेळगावच्या दौडला यावे. कशाचीही पर्वा न करता धारकरी धावतात तसे बेळगावकर दौडमध्ये धावतात. या देशात 1 हजार वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी हिंदूंची सत्ता होती. मोघलांनी ती उलथवली. परंतु त्यांना तोंड देत शिवरायांनी 32 मण सुवर्ण सिंहासन उभे केले. त्यांनी घेतलेली स्वराज्याची शपथ हा पाया तर राज्याभिषेक हा कळस होता. हे सिंहासन सोन्याच्या धातुचे नव्हे तर तानाजी, बाजी यांच्या रक्ताचे व संताजी, धनाजी, मुरारजी यांच्या घामाचे प्रतीक आहे. आज या सिंहासन संकल्पपूर्तीसाठी व खडा पहारासाठी आपली लढाई असायला हवी, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कोल्हे यांचे कौतुकोद्गार
यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, जगात अनेक राजे महाराजे होऊन गेले. अनेकांनी येथे साम्राज्य केले. परंतु संपूर्ण जगात 300 वर्षांनंतरही ज्याचे नाव घेतले जाते आणि त्या नावापाठोपाठ आपला ऊर अभिमानाने भरून येतो असे राजे म्हणजे छत्रपती शिवराय होत. दुर्गामाता दौडच्या माध्यमातून त्यांचे संस्कार तरुण पिढीवर बेळगावमध्ये होत आहेत. याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
असंख्य लोकांनी बलिदान दिल्यानंतर भगवा फडकला आहे. त्याला स्पर्श करणे हे आपले भाग्य आहे, असेही ते म्हणाले. प्रारंभी शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी स्वागत करून वक्त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन कल्लाप्पा पाटील यांनी केले. याप्रसंगी हजारो धारकरी उपस्थित होते.
‘लोकमान्य’चे मानले आभार
संपूर्ण दहा दिवस लोकमान्य को-ऑप. सोसायटीने आपली रुग्णवाहिका दौडच्या वेळी दिली होती. ज्या भागातून दौड निघत असे त्या ठिकाणी ही रुग्णवाहिका थांबत होती. याबद्दल लोकमान्यचे आभार मानण्यात आले.