वादळग्रस्तांचे साहित्य चोरल्याचा आरोप – मुख्य संशयिताला अटक
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर ‘यास’ चक्रीवादळग्रस्तांचे मदत साहित्य चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुवेंदू अधिकारी यांच्यासह त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी, हिमांशू मन्ना आणि प्रताप डे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित प्रताप डे याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तक्रारीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंटाई नगरपालिकेत काम करणाऱया व्यवस्थापन मंडळातील सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला आहे. यामध्ये 29 मे रोजी हिमांशू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मात्र तरीही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद काही केल्या संपताना दिसत नाही. उलट, तो वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. ‘यास’ या चक्रिवादळाने पश्चिम बंगालच्या काही भागांना जोरदार तडाखा दिला. यानंतर मदतकार्य अद्याप सुरू आहे. त्यातच पूर्व मिदनापूर जिह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे.