नंदीग्रामच्या संग्रामाआधी प्रचाराची रणधुमाळी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अतिचुरशीच्या नंदीग्राम निवडणुकीआधी या मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला असून सुवेंदू अधिकारी आणि आणि ममता बॅनर्जी यांच्यात शब्दयुद्ध रंगले आहे. ही निवडणूक सोपी नसल्याची जाणीव बॅनर्जी यांनाही झाली असल्याने त्यांनी गेले तीन दिवस या मतदारसंघात तळ ठोकला आहे. सुवेंदू अधिकारीही जीव तोडून प्रचार करीत आहेत. दोघांनीही आरोप-प्रत्यारोपांच्या पैरी झाडल्या.
आपल्या स्वार्थासाठी सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये गेले. इतकी हाव बरी नव्हे. अधिकारी कुटुंबाला लवकरच हे समजणार आहे, अशी टीका बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात सोमवारी केली. निवडणुकीनंतर सुवेंदू अधिकारी यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होईल. सुवेंदू अधिकारी यांनी ‘माजी आमदार’ असे छापलेली लेटरहेडस् आताच छापून घ्यावीत. नंतर त्यांना त्याचा चांगला उपयोग होईल असाही टोलाही त्यांनी लगावला.
सुवेंदू अधिकारी शांत
ममता बॅनर्जी यांनी सर्व सभ्यतेचे नियम धाब्यावर बसवले असून अद्वातद्वा भाषा बोलण्यास प्रारंभ केला आहे. तथापि, त्यांना मी अशा अश्लाघ्य भाषेत प्रत्युत्तर देणार नाही. 6 एप्रिलला येथे मतदान होणार असून या मतदानातूनच बॅनर्जी यांना त्यांची जागा समजून चुकणार आहे. मी काही बोलण्याची आवश्यकता नाही. ममता बॅनर्जींच्या आक्रस्ताळय़ा प्रचाराला मतदारच प्रत्युत्तर देणार आहेत. हे प्रत्युत्तर 2 मे या दिवशी समजणार आहे, असा प्रतिवार अधिकारी यांनी केला.
ममता बॅनर्जी ‘बेगम’
ममता बॅनर्जी यांनी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा कळस गाठला आहे. जय श्रीराम’ या घोषणेनेही त्यांना कंप सुटतो. त्यामुळे त्यांना लोक बेगम असे म्हणू लागले आहेत. इद मुबारक अशा शब्दांमध्ये त्या मुस्लीमांना शुभेच्छा देतात. त्यांना मुबारक या शब्दाची इतकी सवय झाली आहे, की त्या होळीच्या शुभेच्छा देतानाही होळी मुबारक असे म्हणतात, अशी खोचक टीका त्यांनी प्रचार करताना केली.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघात बाहेरच्या राज्यांमधून समाजकंटक आणले आहेत. त्यांच्या साहाय्याने मतदानाच्या दिवशी लोकांवर दबाव आणण्याची त्यांची योजना आहे, अशी तक्रार तृणमूल काँगेसच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेऊन सादर केली. मात्र ही तक्रार त्यांनी पराभवाच्या भितीपोटी केली असून ती धादांत खोटी आहे, असे प्रत्युत्तर भाजपने दिले.
सुरक्षा रक्षकांसंबंधीही आक्षेप
पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणावर केंद्रीय राखीव पोलीस दलांचे सैनिक आणले आहेत. मात्र, भाजपशासित राज्यांमधील सुरक्षा रक्षकांना आमच्या राज्यात येऊ देऊ नये, अशीही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तृणमूल शिष्टमंडळाने केली. तथापि, निवडणूक आयोगाने केंद्रीय दले नियुक्त केली आहेत. या दलांमधील सैनिक विशिष्ट राज्यांचे नसतात. त्यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाचे नियंत्रण असते. त्यामुळे बॅनर्जींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे तज्ञांचे मत आहे.