केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती : बिहार सरकारची शिफारस
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता पुन्हा नवे वळण मिळाले आहे. सुशांतसिंगच्या तपासावरून मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. नितीशकुमार सरकारने केलेली ही शिफारस केंद्र सरकारने स्वीकारली असून बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाला त्यासंबंधीची माहिती देण्यात आली.
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप आणि नवी माहिती उजेडात येत असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीबीआय चौकशीची शिफारस करण्याची तयारी दर्शवली होती. चार दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीशी यासंबंधी बोलताना त्यांनी याबाबत प्रथमच परखडपणे भाष्य केले होते. सुशांतसिंग यांच्या कुटुंबियांकडून मागणी झाल्यास आत्महत्या प्रकरणाची सीबीआय अधिकाऱयांमार्फत चौकशी करण्यासाठी बिहार सरकारही शिफारस करू शकते, अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली होती. सुशांतसिंगच्या आत्महत्या प्रकरणात नवनवे दुवे बाहेर पडत असल्यामुळे बिहारमध्येही वेगवेगळय़ा संघटनांसह त्याच्या चाहत्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी होत होती. अखेरीस बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केंद्र सरकारकडे केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयालाही यासंबंधी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी त्र+षिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुशांतसिंग आत्महत्येसंबंधी सुनावणी पार पडली.
महाराष्ट्र सरकारला दणका
सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे नावही या प्रकरणात गुंतल्याचा संशय व्यक्त होत असल्याने महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी वाढू शकते. या प्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सरकारकडून वेळावेळी सांगण्यात येत होते. मात्र, आता केंद्र सरकारनेच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याने मुंबई पोलिसांचा नाईलाज होणार आहे. त्यांना तपासाच्या सर्व फाईल्स आता सीबीआयकडे सोपवाव्या लागणार आहेत.
मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत शंका
अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर वेगवेगळय़ा शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसात फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही याचा तपास सुरू केला. मात्र, मुंबई पोलिसांकडून सहकार्य केले जात नसल्याचा आरोप आता बिहार पोलिसांकडून केला जात आहे.
बिहारमधील यंत्रणांचा पुढाकार
दोन्ही पोलीस यंत्रणांकडून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस महासंचालकांनी बुधवारी सुशांतसिंगच्या वडिलांशी संपर्क साधत सरकारने सीबीआय चौकशी करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस आम्ही करत आहोत, असे स्पष्ट केले.
सुशांतसिंग कुटुंबियांकडून सीबीआय चौकशीसाठी दबाव
सुशांतचे कुटुंब सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहार पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यातही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. सुशांतच्या वडिलांनी या प्रकरणी नितीश कुमार यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील जनताही सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होती. आमचे आयपीएस अधिकारी मुंबईत गेले असता त्यांना मुद्दामहून क्वारंटाईन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता.