मुंबई /प्रतिनिधी
सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं गूढ कायम आहे. दरम्यान, सीबीआयने याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
दरम्यान, “सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे मात्र अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे,” असं मंत्री मलिक यांनी म्हंटल आहे.
“एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतंय आणि अजूनही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही,” असंही नवाब मलिक म्हणाले. “बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंह राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आल्याचा,” आरोपही नवाब मलिक यांनी केला.