ऑनलाईन टीम / पाटणा :
सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात तपासावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना, आता यामध्ये नवीन वळण लागले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय’कडे देण्याची शिफारस केली आहे.
पोलीस महासंचालक सुशांतसिंहच्या वडिलांशी सकाळी बोलले. त्यांनी सीबीआय चौकशी करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याची शिफारस आम्ही करत आहोत, असे नितीश कुमार यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. या घटनेचा सध्या मुंबई पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणी मागील काही दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी देखील होत आहे. मात्र, राज्य सरकारने त्याला नकार दिलेला आहे. मात्र, बिहार सरकारने आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.