ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल्या पाटणाचे एस पी विनय तिवारी यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहिली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्पमध्ये घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाइन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाइन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणीवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बिहारचे डि. जी. पी. गुप्तेश्वर पांडे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्वीट केलंय. आयपीएस अधीक्षक विनय तिवारी आज पाटण्याहून मुंबईत त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी बिहार पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत गेले. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री 11 वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन केले. मागणी करुनही त्यांना आयपीएस मेस देण्यात न आल्याचेही पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
विनय तिवारी यांना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहायचे आहे. यासाठी ते वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी बोलले होते. डीसीपी 9 मधील आयजी हेडक्वार्टरशी त्यांचा संपर्क करुन देण्यात आला. त्यांना राहण्यासाठी रुम देण्यात आली होती. पण त्यानंतर आयजी हेडक्वार्टरने त्यांचे फोन उचलले नाहीत.