आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या निधनाने एका सुसंस्कृत, अफाट राजकीय चातुर्य असलेल्या व मातीशी सदैव जोडल्या गेलेल्या नेत्याला देश मुकला आहे. तब्बल पाच दशकांची त्यांची राजकीय कारकीर्द म्हणजे राजकारणातील एक सुवर्णाध्यायच म्हणायला हवा. 1968 पासून सुरू झालेल्या त्यांच्या कारकिर्दीचे दोन टप्पे करता येतील. यातील पहिल्या टप्प्यात खासदार, केंद्रीय मंत्रिपदासह विविध पदे सांभाळताना त्यांनी आपल्या कामाचा राजकारणावर अमीट ठसा उमटविला. वकिलीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले गोगोई हे अखेरच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ आणि बांधलेले राहिले. तब्बल सहा वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा चमत्कार गोगोई यांनी घडविला, तो त्यांच्यातील प्रचंड जनसंपर्क, थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याच्या नैसर्गिक शैलीमुळेच. त्यांच्यातील असामान्य गुणांमुळेच इंदिरा गांधी यांच्या काळात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली, तर राजीव गांधींच्या काळात त्यांच्या हाती सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. स्वाभाविकच या टप्प्यात पक्षसंघटना बळकट करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. गोगोईंकडे असाधारण राजकीय समज होती. त्यांनी उथळ स्वरुपाचे राजकारण कधी केले नाही. कमालीचा संयम व प्रगल्भता हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यामुळे कोणतेही पद मिळविण्यासाठी वा कुठल्याही गोष्टीचे श्रेय लाटण्यासाठी गोगोई यांनी कधी आटापिटा केल्याचे स्मरत नाही. लोकशाहीवर अविचल निष्ठा असणाऱया या नेत्याने सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या आपल्या कार्यशैलीने राजकीय व सामाजिक जीवनात मिळविलेली सर्वमान्यता अद्वितीय अशीच म्हणावी लागेल. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री म्हणून काम पाहणाऱया गोगोईंनी तेथेही उठावदार कामगिरी केली. विविध कमिटय़ांवर काम करतानाही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संसदीय कारकीर्द गाजविणाऱया गोगोईंची प्रादेशिक कारकीर्दही चार पावले पुढे जाणारीच म्हणावी लागेल. आजही आसामचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री म्हणूनच लोक त्यांना ओळखतात. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या राज्यात 2001, 2006 व 2011 असा तब्बल तीन वेळा विजय प्राप्त केला. त्यातूनच त्यांची लोकप्रियता व पकड लक्षात येते. वास्तविक, आसाम व तेथील परिस्थिती ही नेहमीच अत्यंत गुंतागुंतीची राहिली आहे. अशा राज्यात एक नेता सलग 15 वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहतो तसेच जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवितो, ही मोठी गोष्ट मानायला हवी. आसाममधील कट्टरपंथीय वा फुटीरतावादी संघटनांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीही ते सदैव तत्पर राहिले. आतंकवाद ही या राज्याची कायमच समस्या राहिली आहे. मात्र, या संकटाशी दोन हात करीत आसामला वेगळी ओळख मिळवून देण्याचे काम केले असेल, तर ते या कुशल प्रशासकानेच. केवळ आसामला आशेचा किरण दाखवून ते थांबले नाहीत, तर प्रत्यक्षात त्याचे संधीत रुपांतर केले. हे त्यांचे योगदान अतुलनीयच ठरते. त्याचबरोबर त्यांच्याच काळात कार्पोरेटने आसामच्या जमिनीवर सर्वप्रथम पाय ठेवला, हे लक्षात घ्यायला हवे. 2016 च्या निवडणुकीत वैयक्तिक गोगोई हे निवडून आले असले, तरी काँग्रेसची मात्र पीछेहाट झाली. अर्थात हे राज्य गमावल्यानंतरही त्यांची लोकप्रियता कायम राहिली, हे विशेष म्हटले पाहिजे. खरे तर या निवडणुकीत काँग्रेसने एआययूडीएफ पक्षाशी युती करावी, असा एक मतप्रवाह जोमात होता. किंबहुना, त्यास गोगोई राजी नव्हते. या राजकीय गणितामुळे हिंदू-मुस्लिमांमधील विभाजनाला खतपाणी मिळेल, अशी भीती त्यांच्या मनात होती. म्हणूनच हा राजकीय सौदा त्यांनी केला नाही. परिणामी आसाममधून सत्ताच्युत होण्यास हा घटक महत्त्वाचा ठरला, असे मानले जाते. तथापि, शालीनता व सभ्यता अंगी बाणवलेला हा नेता याने पश्चात्तापदग्ध झालेला दिसला नाही. तत्त्वनिष्ठता हा त्यांच्या राजकारणाचा प्राधान्यक्रम होता, हेच यातून अधोरेखित होते. भूमिका घेणे हा तर त्यांचा स्थायीभावच होता. प्रत्येक प्रश्नावर त्यांचे म्हणून एक ठाम मत व भूमिका असे. त्याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. या संदर्भात सीएए कायद्याचे प्रकरण बोलके ठरते. या कायद्याला स्पष्टपणे विरोध करण्यासाठी तब्बल 36 वर्षांनंतर त्यांनी अंगात वकिलीचा कोट चढविला नि सर्वोच्च न्यायालयात सरकारविरोधात युक्तिवाद केला. प्रचंड अभ्यास आणि विषयाच्या मुळाशी जाण्याची क्षमता असलेल्या गोगोईंकडे व्यापक दृष्टी होती. थोडय़ाशा टीकेने आजकालच्या राजकारण्यांचा तोल जातो. त्यांचे तसे नव्हते. मितभाषी असले तरी शांतपणे व हसतमुख उत्तरे देऊन एखाद्या मुद्यातील हवा कशी काढून घ्यायची याचे कसब त्यांच्याठायी होते. संयत व सकारात्मक राजकारणामुळेच जनमानसावर ते दीर्घकाळ राज्य करू शकले. राजकारणाशिवाय बागकाम, पुस्तकांमध्ये रमणाऱया या राजकारण्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतून राजकारण समृद्ध करण्याचेच काम केले. राजकारण म्हणजे केवळ आरोप-प्रत्यारोप, कुरघोडय़ा, पक्षांतर असा बऱयाचदा समज होतो. त्याला कारण भवतालची राजकीय परिस्थितीच होय. परंतु तरुण गोगोई यांच्यासारखी ‘सुसंस्कृत असामी’ या सगळय़ाला छेद देते. ते कोणत्या पक्षाचे होते हा भाग अलाहिदा. पण, त्यांच्यातील पक्षनिष्ठा, लोकांप्रति असलेला जिव्हाळा, विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असलेली तळमळ हे सारे गुण आजच्या राजकारण्यांसाठी आदर्शवत म्हणावे लागतील.
Previous Articleमरणात खरोखर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.