भारत-इंग्लंड दिवस-रात्र तिसरी कसोटी – मोटेरा स्टेडियममधील खेळपट्टीच्या नव्या स्वरुपाची उत्सुकता
अहमदाबाद / वृत्तसंस्था
लेट कटवर सुनील गावसकरांनी पूर्ण केलेला 10 हजार धावांचा माईलस्टोन, कपिलची (9-83) सर्वोत्तम गोलंदाजी आणि त्यानेच रिचर्ड हॅडलीचा सर्वाधिक बळींचा मोडलेला विश्वविक्रम, असे अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवणाऱया अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आजपासून (बुधवार दि. 24) भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी लढत दिवस-रात्र स्वरुपात खेळवली जाणार आहे. नूतनीकरण झाल्यानंतर या मैदानावरील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय लढत असून यामुळे याबद्दल विशेष उत्सुकता आहे. दुपारी 2.30 पासून गुलाबी चेंडूवर पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
आज भारतीय संघ मैदानावर उतरेल, त्यावेळी इशांत शर्मा 100 कसोटी खेळणाऱया जलदगती गोलंदाजांच्या यादीत कपिलदेवच्या मांदियाळीत दाखल होईल, हे या लढतीचे आणखी एक वैशिष्टय़ असणार आहे. सदर सामन्यासाठी 55 हजार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार असून या ऐतिहासिक लढतीत विराटसेनेकडून शानदार खेळाची अपेक्षा असणार आहे.
नूतनीकरण केल्या गेलेल्या सरदार पटेल स्टेडियमवर प्रकाशझोतात अनेक वर्षांनंतर कसोटी सामना खेळवला जाणार असून भारतीय संघ अर्थातच घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका किमान 2-1 अशा फरकाने जिंकणे आवश्यक असून त्याची भक्कम पायाभरणी येथील लढतीत होणार का, याची येथे उत्सुकता असेल.
ही लढत हेडिंग्ले किंवा ओल्ड टॅफोर्डवर असती तर ज्याप्रमाणे जो रुटने हिरवळीची खेळपट्टी पसंत केली असती त्याचप्रमाणे रोहित शर्माने देखील रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल या आपल्या संघातील फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीला प्राधान्य दिले जाणे पसंत केले आहे. अर्थात, जेम्स अँडरसनसारखा दोन्ही बाजूने तितक्याच ताकदीने चेंडू स्विंग करण्याची ताकद असणारा कसलेला गोलंदाज प्रतिस्पर्धी संघात असताना भारतीय संघ फलंदाजी लाईनअप कशी ठेवेल, याची उत्सुकता असेल. सामन्याला दुपारी 2.30 वाजता प्रारंभ होणार असून त्यामुळे शेवटच्या सत्रात दव असणार का, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असतील.
उमेश यादवने तंदुरुस्ती चाचणी पार केली असल्याने भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असून कुलदीप यादवला अंतिम एकादशमधून वगळले जाण्याची शक्यता अधिक आहे. उमेश यादव, इशांत शर्मा नव्या चेंडूवर मारा सुरु करतील. हार्दिक पंडय़ाचा संघात समावेश आहे. मात्र, कसोटी क्रिकेट खेळण्याइतपत तो पूर्ण सुसज्ज आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंडय़ाचा अंतिम एकादशमध्ये समावेश झाल्यास त्याच्याकडून डावात किमान 15 षटके गोलंदाजी करवून घेतली जाईल आणि त्याची फटकेबाजीची क्षमता देखील भारताच्या पथ्यावर पडू शकते.
इंग्लिश रणनीती काय असेल?
इंग्लिश जलद गोलंदाजीची धुरा फक्त अँडरसन व जोफ्रा आर्चर यांच्यावरच असेल की स्टुअर्ट ब्रॉड किंवा मार्क वूड यांच्यापैकी आणखी एक खेळाडू अंतिम संघात समाविष्ट असणार, हे इंग्लंडने अद्याप जाहीर केलेले नाही. बहरात नसलेल्या रोरी बर्न्सची जागा गुणवान फलंदाज झॅक क्राऊली घेऊ शकतो तर तिसऱया क्रमांकासाठी जॉनी बेअरस्टो हा डॅन लॉरेन्सऐवजी संघात येऊ शकेल, असे संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
इंग्लंड ः जो रुट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्राऊली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
सामन्याची वेळ- दुपारी 2.30 पासून.
कोलकात्यातील त्या सामन्याच्या आठवणींना उजाळा
यापूर्वी कोलकात्यात भारताने बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळला, त्यावेळी मोहम्मद शमीने सहा सत्रातच बांगलादेशी फलंदाजीला मोठे भगदाड पाडले होते. मात्र, आता शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे आणि समोर इंग्लिश संघात जो रुट, बेन स्टेक्स, जॉनी बेअरस्टो यांच्यासारखे दिग्गज खेळाडू उत्तम बहरात आहेत. त्यामुळे, उमेश यादव, इशांत यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.
इंग्लंडला मोईन अलीची उणीव जाणवणार का?
इंग्लिश क्रिकेट मंडळाच्या रोटेशन पॉलिसीनुसार, मोईन अलीला मायदेशी पाठवले गेले आहे आणि डॉम बेस व जॅक लीच या लढतीत फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. मात्र, मोईन अलीच्या अनुभवाची उणीव या संघाला जाणवणार का, हे प्रत्यक्ष लढतीत स्पष्ट होईल. यापूर्वी पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवला, त्यावेळी मोईन अलीने देखील त्यात मोलाचा वाटा उचलला होता.
कोटस
गुलाबी चेंडूवरील क्रिकेटमध्ये फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळणे हा जणू ट्रेंडच झाला आहे. पण, माझ्या मते पहिले 20 चेंडू सावधगिरीने खेळले तर अशी हाराकिरी निश्चितपणाने टाळता येऊ शकते. गोलंदाजी लाईनअपबद्दल आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. सामन्याच्या दिवशी सकाळीच ते स्पष्ट होऊ शकेल.
-इंग्लिश कर्णधार जो रुट
गुलाबी चेंडूने खेळताना फिरकी गोलंदाजांचा वाटा महत्त्वाचा राहू शकतो, याबद्दल दुमत नाही. मात्र, माझ्या मते जलदगती गोलंदाजांकडे पूर्ण दुर्लक्ष करुनही चालण्यासारखे नसते. लाल चेंडूपेक्षा गुलाबी चेंडू अधिक स्विंग होतो, हे या लढतीतही दिसून येऊ शकेल.
–भारतीय कर्णधार विराट कोहली
मला स्वतःला दिवस-रात्र सामने खेळण्याचा फारसा अनुभव नाही. पण, द्विप्रकाशात खेळणे कठीण असते, इतके मी बऱयाचदा ऐकले आहे. खेळपट्टीवर सध्या तरी गवत आहे. ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक असेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे.
-इंग्लिश फिरकी गोलंदाज जॅक लीच