स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीचा दुरुपयोग : चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून नवीन पथदीप बसविण्याचा सपाटा स्मार्ट सिटी कंपनीकडून सुरू आहे. मात्र अलिकडेच बसविण्यात आलेले सुस्थितीत असलेले पथदीप देखील बदलण्यात येत आहेत. पण बदलण्यात आलेले जुने पथदीप थेट भंगारात टाकण्यात येत असल्याने काही वर्षापूर्वी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेलेला आहे. त्यामुळे भंगारात टाकण्यात आलेल्या पथदीपांची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 1 हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी खर्ची घालण्यात आला असून, रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, पथदीप, दुभाजक तसेच रस्त्यांच्या शेजारी डेकोरेटिव्ह पथदीप बसविणे आदी कामे करण्यात येत आहे. तसेच शहरातील काही रस्त्यांवर पेव्हर्स घालून सुशोभीकरण करण्यात येत आहे. स्मार्ट रोड बनविण्यासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक रस्त्यावर डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र काही प्रमुख रस्त्यांवर नवे खांब आणि जुने दिवे बसविण्याचा प्रकारदेखील निदर्शनास आला आहे. निविदा काढताना नवीन खांबासोबत नवीन दिवे बसविण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र जुने दिवे बसवून स्मार्ट सिटीचा निधी लाटण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री शहर विकास निधी अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करून नवीन दुभाजक घालण्यात आले होते.
तसेच नवीन पथदीपदेखील बसविण्यात आले होते. हे पथदीप काही मोजकीच वर्षे सुरू होते. मात्र त्यानंतर हे पथदीप बंद अवस्थेत आहेत. पथदीप 10 ते 15 वर्षे खराब होणार नाहीत, अशी हमी देखील कंत्राटदारांनी महापालिकेला दिली होती. तरीदेखील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविताना सुस्थितीत असलेले पथदीप व खांब बदलण्याचा सपाटा सुरू आहे. सध्या सर्वच प्रमुख रस्त्यांवरील पथदीप बदलून नवे डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात येत आहेत.
खर्ची घातलेला निधी वाया
त्यामुळे जुने काढण्यात आलेले पथदीप थेट भंगारात टाकण्यात येत आहेत. जुने पथदीप सुस्थितीत असतानादेखील भंगारात टाकण्यात आल्याने खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरातील काही भागात पथदीप खांब नाहीत, अशा ठिकाणी जुने पथदीप बसवून दिव्यांची सोय करता येवू शकते. पण महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.
सध्या जनतेसाठी मंजूर झालेल्या निधीची लूट स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पथदीप सुस्थितीत आहेत का, दुरुस्ती होऊ शकते का? याची पाहणी करण्यापूर्वीच पथदीप बदलण्याचा सपाटा सुरू आहे.
कंत्राटदार-अधिकाऱयांचे खिसे भरण्यासाठी…
वास्तविक पाहता जुन्या पथदीपांची दुरुस्ती तसेच रंगरंगोटी करून दिवे बदलून वापर करता येणे शक्मय आहे. मात्र कंत्राटदारांचे व अधिकाऱयांचे खिसे भरण्यासाठी सुस्थितीत असलेले जुने पथदीप हटवून नवे पथदीप बसविण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. महापालिकेने बसविलेले पथदीप महापालिकेकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. मात्र सदर जुने पथदीप भंगारात घालण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कोटय़वधी निधी वाया घालविण्यात येत असून पथदीप बदलण्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत.