नवी दिल्ली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच व्यवसायांवर संकट ओढवले असून त्यांना आधार देण्यासाठी देशाने बँकांमार्फत इसीएलजीएस (इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम) योजनेअंतर्गत 62 हजार कोटी रुपये 9 जुलैपर्यंत कर्जरुपी उद्योगांना दिले असल्याची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती नुकतीच दिली. 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेज संबंधीचा प्रगतीचा आढावा घेण्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. इसीएलजीएस अंतर्गत बँकांनी 61 हजार 987 कोटी रुपये कर्जरुपी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना दिले आहेत. पैकी 1 लाख 20000 कोटी रुपये कर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकांना कर्जाच्या रूपाने मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याअंतर्गत 45 लाखपेक्षा अधिक सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्रातील व्यवसायांना एकूण 3 लाख कोटी रुपये तरलतेसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.