प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील सूरल धबधब्यात एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. सदर पर्यटकाचे नाव गौरव अजय शहा (वय 33) रा. सांगली असे आहे. सांगलीमधील काही पर्यटक गोव्याला गेले होते. गोव्याहून येताना ते सूरल धबधबा पाहण्यासाठी गेले होते. जांबोटी-कणकुंबी भागात गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्या भागातील धबधबे प्रवाहित झाले आहेत. यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे. साहजिकच सूरल धबधबा पाहण्यासाठी बरेच पर्यटक आले होते. यावेळी गौरव याचा पाय घसरल्याने तो धबधब्यात पडला. खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी गौरवच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे.