वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्य करीत आहे. यजमान इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. दरम्यान, भारतीय संघातील तीन खेळाडू दुखापतीने जायबंदी झाल्याने त्यांच्या जागी बदली खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि फिरकी गोलंदाज तसेच अष्टपैलू जयंत यादव यांना इंग्लंडला पाठविण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने घेतला आहे.
इंग्लंड दौऱयासाठी यापूर्वी शुभम गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि अवेश खान यांची निवड केली होती. पण भारताचे हे तिन्ही खेळाडू जखमी असल्याने ते कसोटी मालिकेसाठी उपलब्ध राहतील, याची खात्री नाही. दरम्यान, संघ व्यवस्थापनाने हे तिन्ही जखमी खेळाडू कसोटी मालिकेत खेळू शकणार नाहीत, असे मंडळाला कळविले. त्यानंतर मंडळाने तीन बदली खेळाडूंना पाठविण्याचा निर्णय तातडीने घेतला.
मुंबईचा सलामीचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला कदाचित इंग्लंडच्या दौऱयात कसोटी पदार्पण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय संघातील अवेश खान याला सराव सामन्यावेळी दुखापत झाली. आवेश खानच्या अंगठय़ाचे हाड मोडल्याने तो कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे शुभम गिल आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. भारतीय संघाचा अजिंक्मय रहाणे यालाही स्नायू दुखापत झाली आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही तर पहिल्या कसोटीत के. एल. राहुल मधल्या फळीत खेळेल. सूर्यकुमार यादवला कदाचित सलामीला पाठविले जाईल. भारताच्या या तीन बदली खेळाडूंना इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर काही दिवसासाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल.