टी-20 विश्वचषक : विराट कोहली, रोहित शर्मा यांचीही अर्धशतके, भुवनेश्वर-अर्शदीप, अक्षर-अश्विन यांचा भेदक मारा
वृत्तसंस्था /सिडनी
सामनावीर सूर्यकुमार यादवचे वेगवान नाबाद अर्धशतक, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांची अर्धशतके आणि भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षर पटेल व आर. अश्विन यांच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील दुसरा विजय नोंदवताना नेदरलँड्सवर 56 धावांनी मात केली.
या सामन्यात प्रारंभापासूनच भारताने अननुभवी डच गोलंदाजांवर हल्ला चढविला. रोहित शर्मा (39 चेंडूत 53), विराट कोहली (44 चेंडूत नाबाद 62) व सूर्यकुमार यादव (25 चेंडूत नाबाद 51) यांच्या अर्धशतकांमुळे निर्धारित 20 षटकांत 2 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर भेदक मारा करीत नेदरलँड्सला 20 षटकांत 9 बाद 123 धावांवर रोखत भारताने एकतर्फी विजय साकार केला.
या सामन्याआधी याच मैदानावर दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांचा सामना झाला होता. त्यात द.आफ्रिकन फलंदाजांनी जबदरस्त फटकेबाजी केली होती. पण नेदरलँड्सच्या डावापर्यंत खेळपट्टी संथ झाल्याने फलंदाजांना मोकळेपणाने फटकेबाजी करता आली नाही. या खेळपट्टीवर खेळणारा नेदरलँड्स हा चौथा संघ होता. खेळपट्टी जास्त खराब झालेली नसली तरी ती संथ झाल्याने अक्षर पटेल व अश्विन या फिरकी गोलंदाजांनी त्याचा लाभ घेत डच फलंदाजांवर अंकुश ठेवत जखडून ठेवले होते. अपेक्षेप्रमाणे भुवनेश्वर कुमार (9 धावांत 2), अर्शदीप सिंग (2-37) व मोहम्मद शमी (1-27) यांनी अचूक मारा केला. डच फलंदाजांना या दर्जाचा वेगवान मारा सातत्याने खेळण्याची सवय नसल्याने त्यांना जलद धावा करता आल्या नाहीत.
मूळचा पंजाबचा असलेला डचचा सलामीवीर विक्रमजित सिंग (1) भुवनेश्वरच्या अचूक टप्प्याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. अश्विन व अक्षर यांचा फिरकी मारा सुरू झाल्यानंतर डच फलंदाजांना अजिबात मोकळीक न मिळाल्याने त्यांच्या पाठलागातील हवाच निघून गेली. अक्षरने एकही चेंडू वळविला नाही. पण थोडीशी जलद व अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत त्याने फलंदाजांना जखडून ठेवले. मॅक्स ओदाऊद (16), बेस डी लीडे (16), कॉलिन ऍकरमन (17), टॉम कूपर (9), कर्णधार एडवर्ड्स (5), टिम प्रिंगल (15 चेंडूत 20), शरिझ अहमद (नाबाद 16), पॉल व्हान मीकेरेन (नाबाद 14) यापैकी एकालाही विशीच्या पुढे मजल मारता आली नाही. अक्षर पटेल व अश्विन यांनी प्रत्येनी 2 बळी
मिळविले.
सूर्यकुमारची तडफदार खेळी
तत्पूर्वी, भारताच्या डावात सूर्यकुमार यादवने पुन्हा धाडसी फटकेबाजी करीत रोहित व कोहली या वरिष्ठांना झाकोळून टाकले. या तिघांनीही अर्धशतके नोंदवली. केएल राहुल (9) पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानंतर रोहितने धावांचा ओघ सुरू केला तर भारताचा नंबर वन फलंदाज कोहलीने अँकरची भूमिका परिपूर्णतेने बजावत आपले अर्धशतकही पूर्ण केले. कोहलीने प्रथम दुसऱया गडय़ासाठी रोहितसमवेत 73 धावांची तर तिसऱया गडय़ासाठी सूर्यासमवेत अभेद्य 95 धावांची भागीदारी केली. पायचीत झालेला राहुल काहीसा कमनशिबी ठरला. मीकेरेनच्या चेंडूवर तो पायचीत झाला. पण तिरकस जाणारा हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेरून जात असल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. मात्र राहुलला रोहितने डीआरएस न घेण्याचा सल्ला दिल्याने तो माघारी परतला. तसे पाहिल्यास नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये लक्षणीय मारा केल्याने भारताला 1 बाद 32 धावाच जमविता आल्या. 10 षटकाअखेर भारतानी 1 बाद 67 धावांची मजल मारली होती. सूर्याचे आगमन झाल्यानंतर त्यांची गोलंदाजी सुमार वाटू लागली. या दोघांच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या 10 षटकांत 112 धावा निघाल्या. सूर्याने काही धाडसी फटके मारले. त्यात एक्स्ट्रॉ कव्हरवरील लोफ्टेड शॉट व डीप फाईनलेगच्या दिशेने मारलेला लॅप स्कूप लाजवाब होते. सूर्याने आपल्या 25 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार, एक षटकार मारला तर कोहलीने आपल्या खेळीत 3 चौकार, 2 षटकार मारले. रोहित प्रारंभी अडखळत खेळला. पण स्थिरावल्यावर त्याने फटकेबाजी करीत 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने आपले अर्धशतक 37 चेंडूत गाठले.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकांत 2 बाद 179 ः राहुल (12 चेंडूत 1 चौकार), रोहित 53 (39 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), कोहली नाबाद 62 (44 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), सूर्यकुमार यादव नाबाद 51 (25 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी ः प्रेड क्लासेन 1-33, मीकेरेन 1-32. नेदरलँड्स 20 षटकांत 9 बाद 123 ः मॅक्स ओदाऊद 10 चेंडूत 16, बेस डी लीडे 23 चेंडूत 16, ऍकरमन 21 चेंडूत 17, प्रिंगल 15 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 20, शरिझ अहमद 11 चेंडूत नाबाद 16, मीकेरेन 6 चेंडूत नाबाद 14 (3 चौकार), अवांतर 6. गोलंदाजी ः भुवनेश्वर 2-9, अर्शदीप 2-37, अक्षर पटेल 2-18, अश्विन 2-21, शमी 1-27.
सूर्यकुमारच्या वर्षातील सर्वाधिक टी-20 धावा
सूर्यकुमार यादव टी-20 प्रकारात या वर्षातील सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला असून त्याने पाकच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. रिझवानने 19 डावांत 51.56 च्या सरासरीने 825 धावा जमविल्या (झिम्बाब्वे सामन्याआधी) असून सूर्यकुमारने 25 डावांत 41.28 धावांच्या सरासरीने 867 धावा जमविल्या आहेत. आयसीसी टी-20 फलंदाजांच्या मानांकनातही त्याचे दुसरे स्थान थोडक्यात हुकले असून तो आता तिसऱया स्थानावर आहे. या यादीत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱया स्थानावर असून त्याने या वर्षात 38.35 च्या सरासरीने 19 डावांत 652 धावा जमविल्या आहेत. लंकेचा पथुम निसांका (21 डावांत 636, सरासरी 31.80) चौथ्या स्थानावर आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोहली बनला सर्वाधिक धावा जमविणारा दुसरा फलंदाज
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा जमविणारा दुसऱया क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात त्याने हा माईलस्टोन गाठला. नाबाद 62 धावांची खेळी करणाऱया कोहलीने 23 सामन्यांतील 21 डावांत 989 धावा जमविल्या असून त्यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने दोनदा (2014 व 2016) या स्पर्धेत मालिकावीराचा बहुमानही मिळविला. असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे. विंडीजचा गेल 31 डावांत 965 धावा जमवित तिसऱया स्थानावर आहे. त्याने 2 शतके व 7 अर्धशतके नोंदवली आहेत. या क्रमवारीत सर्वाधिक धावा जमवित लंकेचा महेला जयवर्धने पहिल्या स्थानावर असून त्याने 1016 धावा जमविल्या आहेत. त्यात एक शतक व 6 अर्धशतकांचा समावेश आहे.