धर्मात अनुमती नसल्याचा दावा : शाळांमध्ये सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम
वृत्तसंस्था / हैदराबाद
केंद्र सरकारने स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळांमध्ये 1-7 जानेवारीपर्यंत ‘सूर्य नमस्कार’ करविण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केंद्राच्या या निर्णयाला विरोध दर्शवत सूर्य नमस्कार हा सूर्य पूजेचाच भाग असून इस्लाम याची अनुमती देत नसल्याचा युक्तिवाद केला आहे.
सरकारने अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करू नयेत असे म्हणत मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने मुस्लीम विद्यार्थी-विद्यार्थिनींना यात सामील न होण्याचे आवाहन केले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून हा बहुधार्मिक आणि बहुसांस्कृतिक आहे. याच तत्वावर आमची घटना लिहिण्यात आलेली आहे. शालेय अभ्यासक्रम देखील याच आधारावर तयार करण्यात आले आहेत. परंतु सध्याचे सरकार या तत्वापासून भटकत असल्याचे विधान ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह यांनी केले आहे.
शिक्षण मंत्रालयाने स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 30 राज्यांमध्ये सूर्य नमस्कार कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या पहिल्या टप्प्यात 30 हजार शाळांना सामील करण्यात आले आहे. 1-7 जानेवारीपर्यंत शाळांमध्ये सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. 26 जानेवारी रोजी देखील एक कार्यक्रम प्रस्तावित आहे.
देशातील अल्पसंख्याक सूर्याला देव मानत नाहीत, तसेच त्याची उपासना योग्य मानत नाहीत. याचमुळे सरकारने हा निर्देश मागे घेत देशाच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा आदर करावा असे बोर्डाच्या महासचिवांनी म्हटले आहे.