प्रतिनिधी/ चिपळूण
महापुरानंतर शहराच्या भविष्यकालीन उपाययोजनांच्या दृष्टीने शुक्रवारी येथे आलेल्या सेंट्रल वॉटर पॉवर ऍण्ड रिसर्च कमिटीने शिवनदीसह वाशिष्ठी नदीपात्राची पाहणी केली. भविष्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱया उपाययोजनांचा अहवाल ही कमिटी सरकारला सादर करणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या जुलै महिन्यात आलेल्या महापुरात शहर परिसराची मोठी आर्थिक तसेच जीवितहानी झाली. महापूर ओसरल्यानंतर 3 महिने उलटले तरीही पूर आणि उपाययोजना यासंदर्भातील चर्चा अधिक होताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होत नाही. यातच शहरात जलसंपदा विभागाकडून मारण्यात आलेल्या पूररेषेवरूनही वादंग सुरू आहे. आमदार शेखर निकम यांनीही हा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहचवला आहे. एकूणच उपाययोजनांसदर्भात मागणी जोर धरत असतानाच शुक्रवारी केंद्रीय कमिटी येथे दाखल झाली. सेंट्रल वॉटर पॉवर ऍण्ड रिसर्चचे शास्त्रज्ञ डॉ. नीना इसाक, पी. एस. कुंजीर, पी. डी. पाटील, व्ही. आर. मेदे यांनी शुक्रवारी जगबुडी नदीचे मुख गोवळकोट, एन्रॉन पूल, नाईक कंपनी, पेठमाप परिसर, नलावडा बंधाऱयांसह बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीपात्राची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी चिपळुणात पाणी कसे शिरले, याची माहिती या शास्त्रज्ञाना दिली. यावेळी त्यांच्यासोबत रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, चिपळूण उपविभागीय अधिकारी संजय नलावडे, स्थापत्य अभियंता विष्णू टोपरे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे होते.