कृषी पंडित सुरेश देसाई यांचे प्रतिपादन : बेडकीहाळ येथे सेंद्रिय शेतीवर पाठशाळा
वार्ताहर / बेडकिहाळ
सध्याच्या काळात मोठय़ा प्रमाणात विविध रासायनिक खते, विषारी कीटकनाशक यांच्या फवारणीमुळे पिकांबरोबरच मानवी जीवनावर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादनदेखील कमी होत असल्याचे मत कृषी पंडित सुरेश देसाई यांनी व्यक्त केले.
बेडकिहाळ-भोज मार्गावरील चव्हाण मळा परिसरातील राजू कुलकर्णी – मुरूमकर यांच्या शेती तळावर श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना बी. सी. ट्रस्ट निपाणी विभाग, बेडकिहाळ यांच्या वतीने आयोजित शेतकरी क्षेत्र पाठशाळा कार्यक्रमप्रसंगी प्रमुख म्हणून कृषी पंडित सुरेश देसाई हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी मलगौडा गावडे पट्टणकुडी हे होते.
यावेळी क्षेत्र कृषी अधिकारी इराण्णा हितलमणी, युवा शेतकरी सुरेश गोणे, नरेंद्र गोणे, राजू कुलकर्णी- मुरूमकर, ग्राम पंचायत माजी सदस्य चंद्रकांत चौगुले यांची उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक संघाचे सेवा प्रतिनिधी श्रीदेवी चौगुले यांनी केले. याप्रसंगी फोटोपूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुरेश देसाई मार्गदर्शन करताना म्हणाले, सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्या आजूबाजूला सर्व साहित्य आहे. सेंद्रिय प्रयोग करणे सोपे असून यासाठी महिलांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. शेण, मूत्र, गुळ, डाळीचे पीठ एकत्रित करून एका पोत्यात मिश्रण करणे, चार ते पाच दिवसाने पाण्याच्या पाटातून सोडल्यास याचा उपयोग पिकांना चांगल्या पद्धतीने होतो. यामुळे पिकांवर औषध फवारणी करण्याची गरज भासत नसून पिकाची वाढही जोमदार व उत्तमप्रकारे होऊन अधिक उत्पादन मिळते. शेतीमध्ये ऊस शेती ही पट्टा पद्धत असावी. यामध्ये इतर पिके सहजपणे घेता येईल. विशेष करून उडीद, भूईमूग, चवळी सोयाबीन, हरभरा पेरणीच्या 20 ते 22 दिवसात शेंडे खुडावेत. यामुळे पिकाला चांगली वाढ मिळते. उत्पादन भरघोस मिळण्यास हमखास मदत होते. यावेळी सुरेश गोणे, नरेंद्र गोणे, मलगौडा गावडे यांनी आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या पिकांचा अनुभव सांगून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सचिन चौगुले, शिवाजी मुरूमकर, चंदकांत गुरव, धनपाल पाटील, सुरेश चौगुले, आप्पासाहेब चिंचणे, महावीर धड्डपाटील, पांडू पाटील, रघुनाथ मुरूमकर, सुरेश चव्हाण, रावसाहेब लठ्ठे, सुंदर खोत, सुनिता मुरूमकर, जयश्री चव्हाण, संगीत मुरूमकर, प्रज्ञा चव्हाण, वैशाली लठ्ठे, रंजना लठ्ठे, सरोजिनी चव्हाण, राणूबाई कोरे, साऊबाई लठ्ठे, सुरेखा कुलकर्णी उपस्थित होते.