प्रतिनिधी / कडेगाव
सध्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व एकात्मिक नागरी सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रे बंद आहेत. ती तातडीने सुरू करण्याची गरज असून शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले विनाविलंब मिळण्यासाठी बंद असलेली सेतू केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कडेगाव येथे एकात्मिक नागरी सुविधा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना दिले. यावेळी भाजपचे पलूस तालुका अध्यक्ष विजय पाटील, विरोधी पक्ष नेते उदय देशमुख, लक्ष्मण माने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात कोवीड १९ विषाणुची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे गेले दोन ते अडीच महिने झाले देशात लॉकडाऊन सुरू केला आहे. तर काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. मात्र ज्या भागात कोरोना बाधित रूग्ण सापडतात. त्याठिकाणी कंटेनमेट झोनची अंमल बजावणी केली जात आहे. काही दिवसात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. लवकरच दहावी – बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढिल शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. शैक्षणिक प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला, डोमासिएल, जातीचा दाखला, नॉनकिमीलिअर, तीस टक्के महिला आरक्षण, अल्पभूधारक दाखला यांसह विविध दाखल्याची आवश्यकता भासते.
सेतू केंद्र आता सुरू केली नाहीत तर लॉकडाऊन उठल्यानंतर दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होईल. यामुळे सेतू केंद्रात मोठी गर्दी होवून सोशलडिस्टन्सिंगचे पालन करणे अडचणीचे होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दाखले काढण्यासाठी त्रास सहन करावा लागेल. शालेय प्रवेशासाठी लागणारे दाखले विनाविलंब मिळण्यासाठी बंद असलेली सेतू केंद्रे तात्काळ सुरू करण्यात यावी किंवा प्रशासनाने या संदर्भात परिसरातील महाविद्यालये यांना कागदपत्रे पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याची सूचना करावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.