रणजी चषक स्पर्धा : महराष्ट्राचा अवघ्या 44 धावांत खुर्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेनादलाविरुद्ध सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेत महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या 44 धावांत आटोपला. युवा गोलंदाज पूनम पुनिया (11 धावांत 5) तर सच्छिदानंद पांडे (18 धावांत 3 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. यानंतर, पहिल्या दिवसअखेरीस सेनादलाचीही खराब सुरुवात झाली असून त्यांनी 51 षटकांत 4 बाद 141 धावा जमवल्या होत्या. रवी चौहान 49 तर राहुल सिंग 22 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण कर्णधार नौशाद शेखचा हा निर्णय चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात सलामीवीर मुर्तजा ट्रंकवाला बाद झाला. यापाठोपाठ कर्णधार नौशाद शेख (0) व ऋतुराज गायकवाड (4) स्वस्तात बाद झाले. यानंतर अनुभवी अंकित बावणे व राहुल त्रिपाठी यांना थोडाफार प्रतिकार केला. पण, बावणे 41 चेंडूत 6 तर त्रिपाठी 39 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. महाराष्ट्राकडून स्वप्नील बच्छावने 1 चौकारासह 11 तर चिराग खुरानाने 2 चौकारासह 14 धावा फटकावल्या. ही जोडी वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ही जोडी बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजही झटपट बाद झाल्याने महाराष्ट्राचा पहिला डाव 30.2 षटकांत 44 धावांत संपुष्टात आला. सेनादलाकडून पूनम पुनियाने सर्वाधिक 5, सच्छिदानंद पांडे 3 तर दिवेशने 2 गडय़ांना तंबूचा रस्ता दाखवला.
सेनादलाचीही खराब सुरुवात
सेनादलाच्या पहिल्या डावाची सुरुवातही खराब झाली. त्यांचे 36 धावांत 3 गडी माघारी परतले. मात्र रवी चौहान (4 चौकारासह नाबाद 49) व राहुल सिंग (4 चौकरासह नाबाद 22) यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सेनादलाने 41 षटकांत 4 गडी गमावत 141 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे आता 97 धावांची आघाडी आहे. महाराष्ट्राकडून अनुपम संकलेचाने 2 तर मुकेश चौधरी व इंगळे यांनी एकेक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र पहिला डाव 30.2 षटकांत सर्वबाद 44 (स्वप्नील बच्छाव 11, चिराग खुराना 14, पूनम पुनिया 5/11, पठानिया 2/13, पांडे 3/18).
सेनादल 51 षटकांत 4 बाद 141 (अभिजीत साळवी 16, रवी चौहान खेळत आहे 49, राहुल सिंग खेळत आहे 22, रजत पलिवाल 42, संकलेचा 2/37).