वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना संसर्गाचा परिणाम गुरुवारी पुन्हा एकदा शेअर बाजारावरही झाल्याचे दिसून आले. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला ‘महामारी’ (गंभीर आजार) घोषित केल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. तसेच अमेरिकेतील ट्रम्प सरकारने युरोपीय देशांमधील नागरिकांवर घातलेली बंदी व भारत सरकारने खबरदारीची पावले उचलत विदेशातून येणाऱया पर्यटकांचे व्हिसा काही मुदतीसाठी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जागतिक पातळीवर सर्वच देशांच्या शेअर बाजारांवर याचा परिणाम जाणवला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकातही मोठी घसरण पाहायला मिळाली.
विदेशी बाजारातून मिळालेल्या निराशाजनक संकेतांच्या दबावामुळे गुरुवारी सेन्सेक्सने 2,919.26 अंकांनी आपटी घेतली. या घसरणीमुळे सेन्सेक्स दिवसअखेर 32,778.14 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 868.25 अंकानी घसरुन 9,590.15 वर बंद झाला. 2008 नंतरची आतापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शेअरबाजार गडगडल्यामुळे एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्री, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, टीसीएस आणि कोटक महिंद्रा बँकेवर गुरुवारी घसरणीचा सर्वात जास्त परिणाम झाला.
याचप्रकारे राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांकापैकी भारत पेट्रोलियम, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटोकॉप, ओएनजीसी आणि गेल आदी कंपन्यांना नुकसान सोसावे लागले. एकंदर दिवसभरात गुंतवणूकदारांना तब्बल 11 लाख 27 हजार कोटींचा फटका बसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.