रिलायन्सचे समभाग सलग पाचव्या सत्रात तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात पुन्हा बुधवारच्या सत्रात घसरणीचा कल कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 85 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील मिळत्या-जुळत्या संकेतामध्ये आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लि व इन्फोसिस कंपन्या प्रभावीत झाल्या आहेत.
दिवसभरातील कामगिरीमध्ये बीएसई सेन्सेक्स 85.40 अंकांसह 0.16 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 51,849.48 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1.35 अंकांसह वधारुन निर्देशांक 15,576.20 वर स्थिरावत बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांच्या समभागामध्ये आयटीसीचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून टेक महिंद्रा, ऍक्सिस बँक, एशियन पेन्ट्स, टीसीएस, एचसीएल टेक, एचडीएफसी आणि कोटक बँक यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत. दुसरीकडे इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो आणि मारुती आदीचे समभाग लाभात राहिले आहेत. देशातील सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्सचे समभाग मात्र सलग पाचव्या सत्रात तेजीत राहिले आहेत.
अन्य घडामोडींमध्ये अमेरिकेसह आशियाई बाजारात नकारात्मक कल राहिला होता. याचा परिणाम भारतीय बाजारावर राहिला आहे. सरकार लवकरच सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगी करणाची अंतिम यादी सादर होण्याचा अंदाज आहे. यामुळे येत्या काळात सरकारी बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणुकीचे आकर्षण निर्माण होणार असल्याचे भाकीतही अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केले आहे.
का घसरला बाजार?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण संदर्भातील बैठकी अगोदर बुधवारच्या सत्रात चढउताराचे वातारवरण राहिले होते. यासह आर्थिक, आयटी आणि दैंनदिन वापरातील साहित्यांची निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या समभाग विक्री झाल्याने भारतीय बाजाराचा प्रवास खंडित झाल्याचे दिसून आले.