ईशान्येकडच्या राज्यांची म्हणावी तितकी प्रगती झालेली नाही. नागालँडसारख्या राज्यात तर मूलभूत सोयी-सुविधाही नाहीत. इथले तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. बेरोजगारीचं प्रमाणही प्रचंड आहे. शिक्षणाच्या अभावामुळे इथले तरुण वाममार्गाला लागतात. पण डॉ. प्रीतपाल कौर बत्रा हे चित्र बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रीतपाल पोलीस अधिकारी असून विविध उपक्रमांच्या माध्यामातून इथल्या लोकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत.
डॉ. प्रीतपाल कौर बत्रा… दंतरोगतज्ञ असणार्या प्रीतपाल भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्या. त्या 2016 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. नागालँडसारख्या दुर्गम राज्यातल्या तेनसंग नावाच्या अतिदुर्गम जिल्ह्यात त्यांना पोस्टिंग मिळालं. उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्या रूजू झाल्या. तेनसंग जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं, त्यांना सामावून घेतलं. इथल्या लोकांचं प्रेम आणि आपलेपणा बघून प्रीतपाल कौर भारावून गेल्या. आपण बाहेरच्या असल्याची जाणीवच इथल्या लोकांनी होऊ दिली नाही, असं त्या सांगतात. याच कारणामुळे स्थानिकांच्या भल्यासाठी काही तरी करायला हवं, असं त्यांच्या मनात आलं. मग प्रीतपाल यांनी तिथे युपीएससी तसंच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च पुस्तकं तसंच इतर साहित्य आणलं. एवढं करून त्या थांबल्या नाहीत तर अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले, त्यांचं समुपदेशन केलं. वैद्यकीय पार्श्वभूमी असल्यामुळे उपचारही केले. तसंच त्यांना सेंद्रिय शेती तसंच इतर व्यवसायांचं प्रशिक्षणही दिलं. या कृतीमुळे प्रीतपाल कौर यांनी इथल्या नागा लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या लोकांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली.
2018 मध्ये तेनसंगला आल्यानंतर त्यांनी गुन्हेगार तसंच कैद्यांशी दोन हात केलेच, शिवाय शाळा, चर्च, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांशी संपर्क साधला. इथल्या मुलांमध्ये तसंच तरुणांमध्ये कामाची क्षमता असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. इथल्या बर्याच विद्यार्थ्यांनी पदवी मिळवलेली होती. पण प्रशासकीय सेवेत दाखल होण्याच्या दृष्टीने त्यांना कोणतंही मार्गदर्शन मिळत नव्हतं. याच कारणामुळे प्रीतपाल यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सहकारी तसंच स्थानिक प्रशासनाची साथ मिळाली. स्थानिक प्रशासनाने सोशल मीडिया तसंच अन्य माध्यमातून या उपक्रमाची जाहिरात केली. यामुळे प्रीतपाल यांना चांगला प्रतिसाद मिळाला. सुरूवातीला नऊ विद्यार्थ्यांसह सुरू झालेला हा उपक्रम 53 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. या उपक्रमामुळे आपणही काही तरी करू शकतो, ही भावना इथल्या तरुणांमध्ये वाढीस लागत आहे. या 53 विद्यार्थ्यांपैकी काहीजण नागालँड सीएम शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले. काहींनी राज्य सरकारच्या विभागांमधल्या नोकरभरतीसाठी आयोजित परीक्षांमध्ये यश मिळवलं. यापैकी काही मुलं यंदा युपीएससी परीक्षा देणार आहेत. यासोबतही त्यांनी बरंच काम करून ठेवलं आहे. आता त्या या राज्यातल्या नोकलाक जिल्ह्यात पोलीस महासंचालक म्हणून काम बघत आहेत. तिथेही त्यांनी हा उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. फक्त कामापुरता विचार न करता एक पाऊल पुढे टाकून समाजाच्या कल्याणाचा विचार करणार्या अशा आयपीएस अधिकार्यांची देशाला गरज आहे.