अंगणवाडी कर्मचाऱयांचे आंदोलन
प्रतिनिधी /बेळगाव
अंगणवाडी कर्मचाऱयांनी कोरोनाकाळात रात्रंदिवस काम केले आहे. कोरोनाकाळात अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. आता मुलांना पौष्टिक आहार देण्याऐवजी वडिलांच्या बँक खात्यावरच रक्कम जमा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. हे चुकीचे आहे. तेव्हा पूर्वीसारखीच योजना सुरू करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱयांनी महिला आणि बाल कल्याण खात्याकडे निवेदनाद्वारे केली.
अंडी वितरणामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. महिला आणि बालकल्याण खात्याने 399.48 लाख रुपये तातडीने अंगणवाडी कर्मचाऱयांना वितरित करावेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच इतर कामांसाठी हा निधी असून तो तातडीने द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
अंगणवाडीमधील केवळ पाच महिलांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली गेली आहे. अद्याप साडेतीनशेहून अधिक कुटुंबांना नुकसानभरपाईच दिली गेली नाही. तेव्हा त्याचाही गांभीर्याने विचार करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला आणि बाल कल्याण खात्यासमोर जोरदार निदर्शने अंगणवाडी कर्मचाऱयांनी केली. यावेळी डी. डी. पुजारी, गोदावरी राजापूर, सी. एस. मगदूम, सुधा कुलकर्णी, मंदा नेवगी यांच्यासह इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या.