वार्ताहर/ कराड
सैदापूर (ता. कराड) येथील एकाच कुटुंबातील तीन चिमुरडय़ा सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आस्था शिवानंद सासवे (वय 9) आयुषी शिवानंद सासवे (वय 3) व आरुषी शिवानंद सासवे (वय 8, रा. मिल्ट्री हॉस्टेल शेजारी, सैदापूर) अशी मयत बहिणींची नावे आहेत. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबत कराड शहर पोलिसांत अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तीन मुलीसंसमवेत त्यांचे आई-वडील, एक भाऊ, आजी-आजोबा, चुलता-चुलती त्यांची दोन मुले, आत्या व त्यांचा मुलगा असे एकुण 14 जण एकत्र राहातात. सोमवार 14 रोजी सायंकाळी सहा वाजता सासवे कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रितपणे जेवण केले. जेवणात चकुली, वांग्याची भाजी, वांग्याची आमटी आणि भात आदी पदार्थांचा समावेश होता. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवानंद यांची पत्नी आणि तीन मुलींना उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे लगेच त्यांना स्थानिक डॉक्टरांकडे नेऊन उपचार करण्यात आले. उपचारानंतर सर्वजणी घरी गेल्या. 16 रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तिनही मुलींना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना उपचाराकरता कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना आस्था सासवे (वय 9) आणी आयुशी सासवे (वय 3) या दोन बहिणींचा मृत्यू झाला. तर आरुषी सासवे (वय 8) हिचा गुरूवारी मृत्यू झाला. तिन बहिणींचा एका पाठोपाठ मृत्यू झाल्याने सैदापूर हादरून गेले आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने या मुलींची मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र फॉरेन्सीक लॅबकडे व्हेसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असुन त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांचा सखोल तपास सुरू असून नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात येत असल्याचे वरोटे यांनी सांगितले.