साताऱयात सैन्य भरतीसाठी युवक-युवती आक्रमक
प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सातारा जिल्हा हा मर्द मावळय़ांचा व सैनिकांचा जिल्हा आहे. पहिल्या, दुसऱया महायुध्दात सहभागी होवून आज देखील तेवढय़ाच देशाच्या सीमेवर निधडय़ा छातीने उभ्या असेलल्या सैनिकांचा पराक्रमी सातारा जिल्हा. मात्र, या जिल्हय़ातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गेल्या दोन वर्षात सैनिक भरती झालेली नाही. सातारा जिल्हय़ातून सैन्यात जाण्यासाठी हजारो युवक कठोर मेहनत करुन देशसेवेसाठी जातात. त्यांची तयारी सुरु असताना भरती न झाल्याने हे युवक, युवती आक्रमक झाले आणि त्यांनी साताऱयात भरती होण्यासाठी आंदोलन केले असून अशा या सातारा जिल्हय़ाचा केंद्र व राज्य सरकारने मान राखला पाहिजे, अशीच जिल्हावासियांची भावना आहे.
कोरोनाच्या नावाखाली सगळय़ांचे जगणे अवघड झाले आहे. गेली दोन वर्षे कोणतीही भरती झालेली नाही. त्यामुळे भरतीसाठी प्रयत्न करत असलेल्या काही युवकांची वयोमर्यादा ओलांडली असून बेरोजगारीच्या वणव्यात त्यांची जीवनाची होरपळ सुरु आहे. अशा वेळी सैन्य भरतीवर बंदी घालणारे जिल्हाधिकारी या युवकांच्या भविष्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा संतप्त सवाल करत जिल्हयातील शेकडो युवक-युवती सैन्य भरती घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देवून आंदोलक व प्रशासनाची चर्चा केली.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेडस सोशल ऑर्गनायझेशन या संघटनेने केले होते. कोरोनामुळे गेले दोन वर्ष सैन्य अथवा आर्मीमध्ये भरती करण्याचे टाळले जात आहे. त्यामुळे सैन्यदलात भरती होण्यासाठी अपार कष्ट करणाऱया, मेहनत घेत असलेल्या युवक-युवतींवर यामुळे मोठय़ा प्रमाणावर अन्याय झाला आहे. भरतीसाठी असणारा वयाचा निकष संपून गेल्यामुळे जिह्यातील अनेक युवक-युवतींचे भविष्य पणाला लागले आहे. जोपर्यंत सैन्यभरती कधी घेणार हे जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा इशारा युवक, युवतींनी दिला. यावेळी कॉम्रेड ऑर्गनाझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. जयवंत आवळे, सचिव कॉ. अमोल साठे, सातारा जिल्हाध्यक्ष बासित चौधरी, कराड तालुकाध्यक्ष कॉ. रणजित भिसे उपस्थित होते.
यावेळी अनेक युवक, युवतींनी भावना व्यक्त करत मनातील उद्वेग बाहेर काढला. दोन वर्षापासून कोरोनाने जिह्यात मुक्काम ठोकल्यामुळे आयोजित सैन्यभरती जवळ आल्यानंतर त्यावर स्थगिती आणली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे आर्मीची भरती घेण्यात आली होती. मात्र तेथील जिल्हाधिकाऱयांनी भरती घेण्यास मज्जाव केला. सैन्य दलात 5 मार्च रोजी भरती जाहीर केली असताना ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी, राज्य शासनाने, केंद्र शासनाने तातडीने निर्णय घेवून सैन्य भरतीची प्रक्रिया राबवावी, नसलेला कोरोना लोकांच्या माथी मारुन टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार थांबवा, अशी मागणी एका युवकाने यावेळी केली.
नोव्हेंबरमध्ये भरती होईल तयारीला लागा ः खासदार उदयनराजे भोसले
तुम्ही दोन वर्षे का गप्प बसला ? मला का भेटला नाही. त्यावेळीच याबाबत प्रशासनाकडे मागणी केली असती तर कोरोनाबाबतचे नियम पाळून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत प्रशासनाने सदर्न कमांडर यांना कळवले असते. आता दोन वर्षे वाया गेल्याने सैन्य भरती, पोलीस भरती बरोबरच इतर शासकीय विभागांच्या भरतीमध्ये देखील युवक, युवतींना वयाची अडचण येणारच आहे. त्यामुळे ही अडचण काही फक्त तुमची नसून सर्वांचीच आहे. त्यावर शासनाकडून तोडगा काढण्याची गरज आहे. आता चर्चा केल्यानंतर प्रशासनाकडून सैन्य भरती नोव्हेंबरमध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता युवकांनी वेळ न वाया घालवता प्रत्येक दिवस महत्वाचा समजून पुन्हा मेहनत घ्यावी व सैन्य भरतीमध्ये उतरावे.
कंटाळलोय आता, आत्महत्या करतो
कोरोनाचे कारण सांगून सैन्यभरती होत नसल्यामुळे कुटुंबातील सदस्य आम्हाला कंटाळले आहेत. तुम्ही तुमचे बघा असे आम्हाला सांगण्यात येत असल्यामुळे आम्ही आत्महत्या करायची का? असा प्रश्न उपस्थित करत जिल्हाधिकारी यांनी सातारा येथे सैन्य भरती केव्हा घेणार, हे जाहीर करावे. सैन्यभरती घ्या, नाही तर आम्ही आत्महत्या करतो, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी युवक, युवतींमधून आंदोलन स्थळी उमटल्या.
वयात सूट द्या, भरतीची तारीख द्या
सातारा जिह्यातील अनेक युवक-युवतींनी सैन्यदलात भरती होण्यासाठी अपार प्रयत्न केले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात भरती न झाल्यामुळे त्यांचे वयाचे निकष संपुष्टात आले आहेत. युवक-युवतींना सैन्य दलात भरती होण्यासाठी वयाच्या अटींमध्ये दोन वर्षाची सूट द्यावी, जोपर्यंत भरतीची तारीख जाहीर करीत नाही, तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा यावेळी संतप्त युवक-युवतींनी दिला.
वयाच्या शिथीलतेबाबत प्रश्न अनुत्तरितच
खासदार उदयनराजे भोसले यांनी युवकांना सध्याच्या परिस्थित दोन वर्षे वाया गेल्याचे वास्तव मान्य केले. मात्र, त्यावर सैन्य भरती किंवा इतर कोणत्याही शासकीय भरतीत वयाच्या शिथिलतेबाबत प्रशासन काय निर्णय घेणार की नाही याबाबत फारसे भाष्य केले नाही. तुम्ही प्रशासनाला मागण्यांचे पत्र द्या त्यावर काही तोडगा निघू शकेल असे सांगत आंदोलन मागे घ्या आणि भरतीच्या तयारीला लागा असा सल्ला दिला मात्र शेकडो युवकांच्या वयाच्या शिथीलतेबाबतचा प्रश्न प्रशासनाकडे अनुत्तरीतच राहिला. फक्त भरती नोव्हेंबरमध्ये होईल एवढेच समोर आले.