सेना दिनी मिळाली भेट : यूएस आर्मीच्या कॉम्बॅट युनिफॉर्मच्या धर्तीवर निर्मिती
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
सेना दिनाचे औचित्य साधत शनिवारी भारतीय लष्करी जवानांच्या नव्या गणवेशाचे अनावरण करण्यात आले. राजधानी दिल्लीच्या कॅन्टमध्ये आर्मी डेच्या वार्षिक परेडमध्ये पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंनी नवीन गणवेश परिधान करून संचलन केले. शनिवारी देशात 74 वा सेना दिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त आजी-माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. देश सुरक्षित राहावा यासाठी सैन्याने सर्वोच्च योगदान दिल्याचे राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशामध्ये नमूद केले आहे.
दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा परेड ग्राऊंडवर आयोजित कार्यक्रमात पॅरा-एसएफ (स्पेशल फोर्स) कमांडोंनी नवीन गणवेश परिधान करत लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांना मानवंदना दिली. आता सैनिक युद्धभूमी आणि फील्ड पोस्टिंगदरम्यान हा नवीन गणवेश परिधान करतील. भारतीय लष्कराने हा डिजिटल गणवेश नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केला आहे.
हा मल्टी-टेरेन पॅटर्न युनिफॉर्म देशातील विविध भूप्रदेश म्हणजेच वाळवंट, जंगल आणि पर्वत यांसारख्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. तसेच अनेक देशांच्या जवानांच्या गणवेशाचा अभ्यासही करण्यात आला आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी लष्कराने नवीन लढाऊ गणवेशावर अभ्यास गट तयार केला होता. महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये हा गट स्थापन करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात अनेक देशांच्या सैन्याच्या गणवेशाचा अभ्यास करून या गटाने नवीन लढाऊ गणवेश तयार केला आहे. विशेषतः नवीन लष्करी गणवेशाची रचना यूएस आर्मीच्या कॉम्बॅट युनिफॉर्मच्या धर्तीवर करण्यात आली आहे. या प्रकारचा गणवेश प्रशिक्षण, मोहीम आणि कारवाईदरम्यान हालचालींमध्ये अधिक सोयीस्कर असल्याचा दावा तज्ञांकडून करण्यात आला आहे. नवीन गणवेशाचे फॅब्रिक पहिल्या गणवेशापेक्षा अधिक मजबूत परंतु हलके आहे. या गणवेशात सैनिक अधिक आरामात श्वास घेऊ शकतील, असे लष्कराचे म्हणणे आहे.
पंतप्रधानांकडून शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशरक्षणासाठी सज्ज असलेल्या सैनिकांसह आणि शूरवीर सैनिकांचे कुटुंबीय या सर्वांना सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सैन्य त्याच्या शौर्यासाठी आणि कामाप्रती असलेल्या सर्वोच्च नि÷sसाठी ओळखले जाते. देशाच्या संरक्षणासाठी सैन्याने दिलेल्या अमूल्य योगदानाचे वर्णन शब्दांमध्ये करणे कठीण आहे. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय सैन्याने कर्तव्य चोख बजावले आहे. आपत्ती आल्यास नागरिकांना मदत करण्यास सैन्य कायम आघाडीवर राहिले आहे. या कार्याची दखल पंतप्रधान मोदी यांनी सैन्याला शुभेच्छा देताना घेतली.
भारतीय सैन्याने विदेशात शांतीसेना म्हणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. प्रसंगी शत्रूच्या प्रदेशातही आपत्ती आल्यास भारतीय सैन्याने माणुसकी दाखवत मदत केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांचे रक्षण आणि आपत्ती काळात नागरिकांची मदत करत भारतीय सैन्य आपले देशाच्या संरक्षणाचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन पंतप्रधानांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.