प्रतिनिधी/ बेळगाव
देशाचे रक्षण करणाऱया सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले केले जात आहेत. राज्यात अशा अनेक घटना घडल्या असून यामुळे सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे असे प्रकार वेळीच रोखा, अशी मागणी अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.
रायचूर जिल्हय़ातील लिंगसूर येथे 20 जणांनी बीएसएफ जवान व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये जवानाच्या आईचा मृत्यू झाला तर जवानही गंभीर जखमी झाला आहे. क्षुल्लक कारणावरून हा खून झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्या सैनिकाच्या कुटुंबीयाला कायदेशीर मदत व संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष बसप्पा तळवार, उपाध्यक्ष विरुपाक्ष तिळगंजी, नागप्पा कळसण्णावर, शिवरायप्पा गुरुवण्णवर, चांदसाब वालीकर, जगदैय्या पुजेरी, अशोक महाचार्य यांसह इतर सदस्य उपस्थित होते.