ऑनलाइन टीम / पुणे :
आपण छोटे दु:ख झाले तरी ते कवटाळून रडत बसतो, परंतु आपले सैनिक मात्र वैयक्तिक दु:ख विसरुन देशासाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी तयार असतात. आजच्या युगामध्ये चुकीचे हिरो तयार करुन समाजाची दिशाभूल करीत आहोत. त्याऐवजी तरुणांना सैनिकांच्या शौर्यगाथा सांगितल्या पाहिजे कारण तेच खरे समाजाचे हिरो आहे, अशी भावना सैनिकांसाठी भारत-चीन सीमेवर ऑक्सिजन प्लँट उपलब्ध करुन देणाºया सुमेधा चिथडे यांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मातृशक्ती, समस्त हिंदू आघाडी, लाल महाल उत्सव समिती, राष्ट्र सेवा समिती यांच्यातर्फे सुमेधा चिथडे यांच्यासह वीरमाता आणि वीरपत्नींना नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते मातृगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. सुनंदा कोंढरे, सारिका वारुळे, प्रिती शिंदे, चारुलता काळे, दिपाली गीते, सुजाता मुंगळे, अनुराधा घोरपडे, मनिषा शेलार आदी यावेळी उपस्थित होते.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, मुलांना लहानपणी मोबाईल आणि टिव्हीच्या आहारी जाऊन देण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि देशाच्या युध्दामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. जर आपण आज त्यांच्यामध्ये वीरतेचे बीज पेरले तर भविष्यामध्ये राष्ट्र घडविणारे तरुण निर्माण होतील.
प्रा. ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, राजामाता जिजाऊ या राष्ट्रमाता आणि स्वातंत्र्यमाता होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनीच स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा दिली. आजच्या महिलांनी आपल्या मुलांना राजमाता जिजाऊ यांच्याकडून प्रेरणा घेऊन राष्ट्रासाठी काम करण्याचे प्रोत्साहन दिले पाहिजे.