सोशल मिडीयावरील जाहिरातीमुळे राज्यासह परराज्यातील युवकांची हजेरी, उपाशीपोटी फिरण्याची वेळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूरात 21 नोव्हेंबर रोजी सैन्यभरती होणार असल्याची जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि सैन्यात भरती होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील युवक दोन दिवसांपासून कोल्हापूरात दाखल झाले. प्रत्यक्षात अशा प्रकारची भरतीच नसल्याची माहिती मिळाल्यानंतर या तरुणांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. सोशल मिडीयावरील या अफवेने अनेक तरुणांना मनस्तापासोबतच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. शहरात एस. टी. स्टँड, रेल्वेस्टेशनवर राहून या तरुणांनी दिवस काढले. खिशातील पैसेही संपल्याने गावी परत जाण्याचे वांदे झाले.
कोल्हापूरात सैन्य भरती होणार असल्याचा सोशल मिडीयावरील संदेश वाचून कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह राज्यातील नागपूर, अमरावती, अकोला, धुळे, जळगांव, नाशिक यासह कानाकोपऱयातील हजारो युवक कोल्हापूरात दाखल झाले. रविवारी भरती असल्याने गुरुवारपासूनच हे युवक कोल्हापूरात दाखल झाले. शुक्रवार, शनिवारी हजारो युवकांनी टेंबलाईवाडी येथील टी. ए. बटालियनमध्ये चौकशी केली. मात्र अशा प्रकारे कोणतीच भरती नसल्याचे बटालियनच्या वतीने सांगण्यात आल्यानंतर मात्र या तरुणांची घोर निराशा झाली.
दोन दिवस हे तरुण एसटी. स्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, सासने ग्राउंड परिसरात पाठीवर सॅक टाकवून या परिसरात फिरत आहेत. फुटपाथवर झोपून रात्र काढत आहेत. परराज्यातील युवकांनी गाव सोडून आठ दिवस झाले आहे. सोबत आणलेले पैसे संपल्याने तरुणांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांना परत जाण्याचेही अवघड झाले आहे. यामुळे हे तरुण शहराच्या विविध भागात फिरत आहेत.
उसनवारी करून आणलेले पैसेही संपले असून उपाशी असल्याचे अमरावतीच्या चेतन चव्हाण याने सांगितले. तर कोल्हापूरात सैन्य भरती असल्यास त्यापूर्वी तसा संदेश आपणाकडे पाठवला जातो. या पत्रानुसार सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकासाठी आपले अन्नछत्र सुरू असते. पण असा सैन्यभरतीचा शासकीय संदेश आलेला नाही, असे व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांनी सांगितले.
अफवांचे पीक
कोरोनाकाळात करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर अफवांना उत आले होते. मुंबई सीएसटी टर्मिनल येथून परप्रांतीयासाठी रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याच्या अफवेनेही अशीच गर्दी केली होती. यानंतर कोल्हापूरातही भरतीच्या अफवेने अशीच गर्दी झाली.