भारत जोडो यात्रेत सहभागी : राहुल गांधी यांच्यासमवेत अर्धा कि. मी. पायपीट
प्रतिनिधी /बेंगळूर
जुने म्हैसूर भागात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्य काँग्रेस नेत्यांनी कसरत सुरू केली आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का देण्यासाठी आतापासून राज्य काँग्रेस नेत्यांनी तयारी चालविली आहे. आजारी असल्याने अनेक दिवसांपासून सार्वजनिक सभा-समारंभांपासून अलिप्त राहिलेल्या सोनिया गांधी गुरुवारी मंडय़ा जिल्हय़ाच्या पांडवपूर येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
गुरुवारी पांडवपूर तालुक्यातील चिन्य येथे सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून कर्नाटकातील पाचव्या दिवसाच्या भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी राहुल गांधी यांच्यासमवेत सोनिया गांधी सहभागी झाल्या. त्यामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या पदयात्रेत सोनिया गांधी सहभागी झाल्याने पक्षातील नेत्यांच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली. सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मुभा दिली नाही. दरम्यान, गुरुवारी पदयात्रेत काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले.
आजूबाजूच्या गावातील अबालवृद्धांची गर्दी
पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, विधानपरिषदेचे विरोधी नेते बी. के. हरिप्रसाद, माजी खासदार धुवनारायण, एम. बी. पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, काँग्रेसमधील महिला आमदार व इतर नेते सहभागी झाले. सोनिया गांधींना पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील अबालवृद्ध जमले होते. अनेक महिला कार्यकर्त्या कलश डोक्यावर घेऊन पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. पदयात्रेला जमलेला जनसमुदाय पाहून सोनिया गांधी भारावून गेल्या. अर्धा कि. मी. पायी मार्गक्रमण केलेल्या सोनिया गांधी कारमध्ये बसून निघून गेल्या. आजारपणामुळे अधिक अंतर न चालण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. गुरुवारी पदयात्रेला सुरुवात होण्याआधी राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या बुटांचे लेस बांधून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विजयादशमीदिनी देवदर्शन
दसऱयामुळे मंगळवार आणि बुधवारी पदयात्रा थांबविण्यात आली होती. सोमवारी दुपारीच म्हैसूरला आलेल्या सोनिया गांधी यांनी कबिनी जलाशय परिसरातील एका रिसॉर्टमध्ये दोन दिवस वास्तव्य केले होते. बुधवारी विजयादशमीनिमित्त त्यांनी भीमनकोटे येथील मादेश्वर मंदिरात देवदर्शन घेऊन विशेष पूजा केली. तर गुरुवारी सकाळी पदयात्रेत सहभागी झाल्यानंतर मेलुकोटे येथील चेलुवरायस्वामी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या दिल्लीला रवाना झाल्या. सायंकाळी पदयात्रेची मंडय़ा जिल्हय़ाच्या ब्रह्मदेवरहळ्ळी येथे सांगता झाली. शुक्रवारी सकाळी येथून पुन्हा पदयात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे.
कोणताही प्रभाव पडणार नाही : बोम्माई
सर्वच पक्षातील प्रमुख नेते स्वतःच्या पक्षासाठी काम करतात. सोनिया गांधी भारत जोडो पदयात्रेत अर्धा किलोमीटर चालून परत निघून गेल्या. या पदयात्रेचा किंवा सोनिया गांधी यांच्या सहभागाचा राज्य राजकारणावर कोणताही प्रभाव पडणार नाही. भारत जोडो यात्रेच्या आधी घेतलेल्या निर्णयानुसार भाजप राज्यभरात पाच रॅली काढणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे.