काँगेस महासचिवांची बैठक, सदस्यनोंदणीवर एकमत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 1 नोव्हेंबरपासून काँगेस पक्ष देशव्यापी सदस्यनोंदणी अभियानाचा प्रारंभ करणार आहे. तसेच लोकशाहीच्या गळचेपीविरोधात जनतेचे प्रबोधन करणार आहे, अशी माहिती पक्षाच्या महासचिवांच्या बैठकीनंतर करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान सोनिया गांधी यांनी भूषविले होते. राहुल गांधीही उपस्थित होते. या बैठकीत राज्य स्तरीय काँगेस नेत्यांच्या उदासीनतेसंबंधी सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करुन त्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत.
देशाच्या कानाकोपऱयात पोहचून जनजागृती करण्यासंबंधी काँगेस भर देणार आहे. बैठकीत यावर एकमत झाले. सदस्यनोंदणी अभियान 1 नोव्हेंबर 2021 पासून 31 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. सदस्यनोंदणी करताना पहिल्यांदाच मतदान करणाऱयांना प्राधान्य देण्यात येईल. युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय राष्ट्रीय काँगेसचे सदस्य करण्याचा पक्षाचा विचार आहे. सदस्यनोंदणीसमवेत, लोकांचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. भाजप आणि संघपरिवाराकडून केवळ काँगेसवरच नव्हे, तर न्याय, समता आणि घटनेतील मूलतत्वे यांच्यावर सुनियोजित हल्ला चढविण्यात येत आहे. लोकांना यासंबंधी माहिती देऊन त्यांना काँगेसच्या विचारसरणीकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले.
राज्यस्तरीय नेते उदासीन
काँगेसच्या राज्यस्तरीत नेत्यांमध्ये उत्साहाचा अभाव असून ते आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडताना दिसत नाहीत, अशी चिंता काँग्रेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महासचिवांच्या बैठकीत व्यक्त केली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणांसंबंधी या नेत्यांमध्ये एकवाक्यता आणि स्पष्टता नाही. भाजप आणि संघाच्या अपप्रचाराविरोधात पक्षाने लढा उभारण्याची आवश्यकता आहे. भाजप सरकारची असत्ये उघडय़ावर आणण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनी कंबर कसण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी राज्यातील नेत्यांच्या कार्यपद्धतीसंबंधी तीव्र नाराजी करुन त्यांना सुधारण्याचा सल्ला दिला.
शिस्तीवर भर
पक्षाच्या नेत्यांमध्ये शिस्तीबद्धपणा नाही. एकात्मतेची भावनाही नाही. एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानणारे नेते पक्षात आहेत. यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. भाजप विरोधातील लढाईत असा ढिसाळपणा चालणार नाही. पक्षाने एकदिलाने आणि एकमनाने आव्हानांचा स्वीकार केला पाहिजे, अशा अनेक सूचना सोनिया गांधींनी महासचिवांना आणि नेत्यांना केल्या.
पाच राज्यांमधील निवडणुका
आगामी काही महिन्यांमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाने आक्रमकपणे प्रचार केला पाहिजे. नेत्यांनी आपापसातील भांडणे आणि मतभेद विसरुन प्रचार कार्याला लागण्याची आवश्यकता आहे. नेत्यांनी आपल्या व्यक्तीगत महत्वाकांक्षांना आवर घालून पक्षासाठी एक झाले पाहिजे. तरच प्रभावी कामगिरी करता येईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बंडखोर नेत्यांना गर्भित इशारा
या बैठकीत गांधी यांनी नाव न घेता पक्षातील ज्येष्ठ बंडखोर नेत्यांना गर्भित इशारा दिल्याचे मत राजकीय वर्तुळात होत आहे. पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी काही महिन्यांपूर्वी पत्र पाठवून गांधी घराण्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाला पूर्ण वेळ काम करणारा अध्यक्ष हवा, अशी मागणी त्यांनी केली होती. कपिल सिबल, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरुर इत्यादी नेत्यांसह अनेकांनी हे पत्र लिहिले होते. या सर्व नेत्यांना गांधी यांनी या बैठकीत अप्रत्यक्षरित्या समज दिली, असे मानले जात आहे.