दिल्लीतील प्रदूषणामुळे घेतला निर्णय
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी व त्यांचे पूत्र खासदार राहुल गांधी हे दोघेही काल शुक्रवारी दुपारी विश्रांतीकरीता गोव्यात पोहोचले. दोघेही दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलवर विश्रांती घेत आहेत.
श्रीमती सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत अलिकडे दोन – तीन वेळा बिघाड झाला. दिवाळीच्या 8 दिवस अगोदर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर विदेशात एका इस्पितळात त्यांच्यावर इलाज करण्यात आले. त्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या.
दिल्लीतील सध्याचे वातावरण हे अत्यंत प्रदूषित आहे, त्यामुळे मोकळ्य़ा व स्वच्छ वातावरणासाठी गोवा किंवा तामिळनाडू या दोन राज्यांचा विचार करण्यात आला असता त्यांनी गोव्याची निवड केली. गोव्यात सध्या स्वच्छ व मोकळे वातावरण असल्याने केवळ विश्रांती करीता त्या दुपारी विमानाने दिल्लीहून गोव्यात पोहोचल्या. दाबोळी विमानतळावर त्यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त होता. त्यांच्या बरोबरच दिल्लीहून खास सुरक्षा रक्षकही गोव्यात पोहोचले आहेत. गोव्यात बहुदा त्या किमान एक आठवडा तरी विश्रांती घेतील असा अंदाज आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सर्वात मोठय़ा अशा दोन व्यक्ती गोव्यात पोहोचल्याने गोव्यातील काँग्रेस नेत्यांना देखील हुरुप आलेला आहे. राहुल गांधी गोव्यातील भेटीमध्ये काही पदाधिकाऱयांशी बैठक करतील असा अंदाज पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. विमानतळावरुन उतरुन ते दोघेही दक्षिण गोव्यात लिला बिचवर विश्रांतीसाठी गेल्याचे वृत्त आहे.