पंढरपूर / प्रतिनिधी
“या….पंढरपूरात वाजतं गाजतं …. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं…” या भक्तीगीतांच्या आणि विठुरायांच्या जयघोषात आज विठठलांचे आणि रुक्मिणीमातेचा विवाहसोहळा येथील मंदिरात मोठया थाटामाटात आणि सनई चौघडयांच्या निनादात संपन्न झाला. यावेळी सुमारे दोन हजाराहून अधिक व-हाडी मंडळीही या सोहळ्यास उपस्थित होते.
सकाळी साधारणपणे 9 वाजता रूक्मिणी स्वयंवरांची कथा येथील सभामंडपात सुरू झाली. यावेळी संपूर्ण विठठल मंदिर हे फुलांनी एका लग्नमंडपाप्रमाणे सजविण्यात आले होते. परंपरेप्रमाणे रूक्मिणीमातेच्या गर्भगृहातून मानाचा गुलाल हा विठठलांच्या गभृगृहात नेण्यात आला. तेथे विठोबाची विधीवत पूजा करून विठठलांच्या अंगावर गुलाल उधळण्यात आला. त्यानंतर सदरचा गुलाल हा विठठलाकडून रूक्मणीमातेकडे आणण्यात आला. याठिकाणी सदरचा गुलाल हा रुक्मिणीमातेच्या अंगावरही उधळण्यात आला. त्यानंतर रुक्मिणीमातेची पूजा करून मुख्य विवाह सोहळयास सुरूवात झाली.
साधारणपणे सकाळी साडे अकरांच्या सुमारास येथील सभामंडपामधे विठठलांची आणि रूक्मिणीमातेची अलंकाराने सजविलेली उत्सवमुर्ती आणण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. अनुराधादीदी शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवराचा शेवटचा अध्याय सांगण्यास सुरूवात केली. प्रसंगी विठठल रूक्मिणीच्या मूर्तीसमोर आंतरपाठ धरण्यात आला. आणि विठठलाचे आणि रूक्मिणीमातेचे लग्न हे मंगलाअष्टका म्हणून “ शुभमंगल सावधान ” असे म्हणत लावण्यात आले. यावेळी मंदिर समितीकडून आलेल्या सर्व भाविकांना अक्षता वाटण्यात आल्या होत्या. सदरच्या सर्व भाविकांनी मोठया प्रमाणावर विवाह सोहळा झाल्यावर जल्लोष केला. यावेळी सनई चौघडेही लावण्यात आले होते. आणि याचवेळी सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं अशा निनादात भजनही करण्यात आले.
विठठलांच्या मूर्तीस पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात आला होता. तर रूक्मिणीमातेसही रेशमी पैठणी नेसून डोक्यांपासून ते चरणापर्यत अलंकार परिधान करून सजविण्यात आले होते . तसेच यावेळी दोन्हीही उत्सवमूर्तीस मोत्यांच्या मंडवळया देखिल कपाळी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे विठठल आणि रखुमाई हे साक्षात नव वधू – वर वाटत होते. त्यामुळे प्रसंगी भगवंताचे दिसणारे सौदर्य हे अनेकांना भुरळ पांडणारे होते.
याचबरोबरीने येथील उत्पात समाजाच्या देखिल रूक्मिणीमाता उपासना मंदिरामधे वसंत पंचमीचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. यामधे विठोबाचा आणि रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा , स्वयंवर कथा आणि झाल्यावर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला.