जे चकाकते ते सर्व सोने नव्हे : पितळेची नाणी देऊन घातला जातोय गंडा : बेळगावतील अनेक जण टोळीच्या नादी लागून कंगाल
प्रतिनिधी /बेळगाव
पाया खणताना सोन्याचा हंडा सापडला आहे. यापैकी एक-दोन किलो तुम्हालाच द्यायची इच्छा आहे. पैशाला महत्त्व नाही. माणूस महत्त्वाचा असतो. पाच-दहा लाख घेऊन या आणि दोन किलो सोने घेऊन जा. तुमचेही भले होऊ दे, अशा भल्याच्या बाता करीत सावजाला लुटणाऱया सोनेरी टोळीच्या कारवाया वाढल्या आहेत. बेळगाव शहर व जिल्हय़ातील अनेक जण या टोळीच्या नादी लागून अक्षरशः कंगाल झाले आहेत. खासकरून शिमोगा, दावणगेरी, बळ्ळारी जिल्हय़ात या टोळीचा वावर आहे.
प्रसंग 1- ऐतिहासिक हम्पी पाहायला गेलेल्या विजापूरच्या युवकाला एक वृद्ध भेटतो. ‘दादा, तुमचा मोबाईल क्रमांक द्या. मला तुमचे भले करायचे आहे’, असे सांगत तो त्या युवकाचा मोबाईल क्रमांक मिळवतो. दुसऱया दिवसापासून त्याला फोन येणे सुरू होते. स्वस्तात सोने मिळवण्याच्या आशेने हा तरुण आपल्या चार-पाच सग्यासोयरांना एकत्र आणतो. हे सारे जण अंगावरचे सोने गहाण ठेवून 15 लाख रुपये जमा करतात. शिमोगा जिल्हय़ातील आनवट्टी, ता. सोरब येथे पोहोचतात. त्यांच्याजवळील 15 लाख रुपये घेऊन त्यांना पितळी नाण्यांची पिशवी सोपविली जाते.
प्रसंग 2- गोकाक फॉल्स पहायला गेलेल्या देशनूर, ता. बैलहोंगल येथील एका युवकाला एक वृद्ध भेटतो. त्याचा मोबाईल क्रमांक मागून घेतो. ‘एक-दोन दिवसात तुला फोन करणार आहे. काम तुझ्या भल्याचे आहे’, असे सांगून तो वृद्ध निघून जातो. नंतर त्याला फोनकॉल येतात. शिमोगा जिल्हय़ातील एका निर्जनस्थळी त्याला बोलाविले जाते. त्याच्याजवळील 12 लाख रुपये घेऊन त्याच्या हातातही पितळी नाण्यांची थैली दिली जाते. पैसे घेऊन भामटा पसार झाल्यानंतर थैलीतील नाणी तपासली असता ती खोटी असल्याचे त्याच्या लक्षात येते.
प्रसंग 3- बेळगाव येथील एका तरुणाला फोन येतो. ‘नारळाचे झाड लावण्यासाठी खोदाई करताना सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यातील किलोभर सोने तुला देण्याची इच्छा आहे. येऊन घेऊन जा’, असा निरोप दिला जातो. हा तरुण आपला मित्र व अडीच लाख रुपये घेऊन शिमोगा जिल्हय़ातील हाडोनहळ्ळी हे गाव गाठतो. त्याच्या अंगावर धावून जाऊन त्याच्याजवळील दोन मोबाईल व अडीच लाख रुपये काढून घेतले जातात. 400 ग्रॅम बनावट सोन्याचे नाणे देऊन त्याला तेथून हाकलले जाते.
असे प्रकार नित्याचे झाले आहेत. बेअब्रू होण्याच्या आणि पोलीस आमचीच उलट तपासणी करतील या भीतीने यापैकी कोणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. जिथे त्यांची फसवणूक झाली, त्या परिसरात सोनेरी टोळीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणखी दहा-बारा जणांना सोबत घेऊन वारंवार खेपा मारल्या तरी गुन्हेगारांचा थांगपत्ता लागत नाही, अशी स्थिती आहे. फसवणुकीचे असे बहुतेक प्रकार दावणगेरी, होन्नाळी, न्यामती, शिमोगा, सोरब, हरपनहळ्ळी परिसरात घडू लागले आहेत.
बेळगाव, चंदगड, आजरा, गडहिंग्लज परिसरातील अनेक जण स्वस्तात सोने मिळविण्याच्या मोहापायी अक्षरशः कंगाल झाले आहेत. उपलब्ध माहितीनुसार गडहिंग्लज येथील एका तरुणाला तब्बल 20 लाख रुपयांना ठकविण्यात आले आहे. या प्रकरणाचीही पोलिसात नोंद झाली नाही. सोनेरी टोळीने ज्यांची फसवणूक केली आहे, त्यांच्याशी ‘तरुण भारत’ने संवाद साधला असता साऱया प्रकरणातील गुन्हेगारी पद्धत एकच आहे, असे आढळून आले. खासकरून सर्वप्रथम पर्यटनस्थळी सावजाला गाठले जाते किंवा झाडू, पायपोस विकण्याच्या निमित्ताने शहरात फिरणारे सावजाला गाठतात. सोन्याचे सॅम्पल नेण्यासाठी आणि व्यवहार ठरविण्यासाठी एखाद्या मंदिराजवळ बोलाविले जाते.
गुन्हेगार सावजाला जे सॅम्पल देतात, ते सोने खरे असते. त्यामुळे सावज भाळते. काही करून ही संधी सोडायचीच नाही, या मानसिकतेतून पुढील रक्कम गोळा करण्याची तयारी केली जाते. बँका, सोसायटय़ातून कर्ज काढले जाते. स्वतःजवळ असलेले सोनेही गहाण ठेवले जाते. मित्रांकडून उसने घेऊन पैसा उभा केला जातो. कसेही किलोभर सोने मिळणार आहे. ते विकून कर्ज फेडू, या समजुतीत सोने विकत घेणारा वावरत असतो. त्याला विश्वास बसेल, अशी गुन्हेगारांची भाषा असते. अखेर स्वस्तात सोने घेण्याची वेळ येते, त्यावेळी कार्यक्रमात थोडा बदल होतो. ‘आम्ही पैसे मोजत नाही, तुम्ही पिशवी उघडू नका’ असा ठराव होतो. तेथेच सावज जाळय़ात अडकते.
या सोनेरी टोळीतील गुन्हेगारांचा संपूर्ण राज्यात वावर आहे. बेळगाव जिल्हय़ातील गोकाक, घटप्रभा परिसरात तर या टोळीतील गुन्हेगारांचे वास्तव्य असले तरी प्रत्यक्षात व्यवहार ठरविण्यासाठी मात्र दावणगेरी किंवा शिमोगा जिल्हय़ालाच पाचारण केले जाते. निर्जन ठिकाणी पैसे काढून घेऊन प्रसंगी सावजाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते. सोन्याने सध्या 50 हजार प्रतितोळय़ाचा दर गाठला आहे. अशा परिस्थितीत पाच-दहा लाखांना किलोभर सोने कोण देईल, हा साधा प्रश्न आहे. मात्र, स्वस्तात सोने मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक जण कंगाल होत आहेत.
देशात इतर ठिकाणीही फसवणूक
केवळ कर्नाटकच नव्हे तर देशभरातील वेगवेगळय़ा राज्यात स्वस्तात सोने देण्याचे सांगून फसवणूक करणाऱया टोळय़ांचा वावर आहे. राजस्थानमधील अलवार परिसरातील टोळय़ांचा तर देशभर संचार असतो. ही टोळी राजस्थानमधील असली तरी व्यवहारासाठी ते सावजाला वेगवेगळय़ा राज्यात बोलावतात आणि त्याच्याजवळील रक्कम लुटून त्याला बस तिकिटालाही महाग बनवतात. आंध्रप्रदेश, गुजरातमध्येही अशा टोळय़ा आहेत. मात्र, त्यांची पद्धत थोडी वेगळी आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्हय़ातून आल्याचे सांगणारी एक टोळी तर केवळ डॉक्टरांना लक्ष्य बनविते. आधी एखाद्यावर उपचारासाठी डॉक्टरांची भेट घ्यायची. फी देण्यासाठी पैसे नाहीत, असे सांगत त्यांना सोन्याचा एखादा तुकडा द्यायचा. नंतर ‘साहेब, आमच्याजवळ असे तुकडे खूप आहेत. पैशांची गरज आहे. दोन लाख रुपये तयार ठेवा. किलोभर सोने आणून देतो’, असे सांगत डॉक्टरांची फसवणूक केली जाते. सामान्य माणसाने अशा टोळय़ांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या बुद्धीचा वापर करून सावध राहणे गरजेचे आहे.