5 ऑक्टोबरला कोरेगाव, बारामतीलाही जाणार
प्रतिनिधी/ सातारा
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात पॉवरफुल पवार घराण्याने आजारी साखर कारखाने अत्यल्प किंमतीत विकत घेण्याची एक वेगळी मोडस ऑपरेंडी राबविली आहे. कारखाने विकत घेणारे पण हेच, व्हॅल्युएटर सुध्दा यांचेच, लिलाव प्रक्रियेत सुध्दा हेच शरद पवार. या पॉवरफुल परिवाराने शिकण्यासाठी मला हा वेगळा विषय दिला आहे, अशी जोरदार राजकीय टोलेबाजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, जरंडेश्वर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या पाच ऑक्टोबरला मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे जाताना मंगळवारी पहाटे सातारा विश्रामगृहात थांबले होते. सकाळी सात वाजता जरंडेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याचे मुळ संस्थेचे उपाध्यक्ष व संचालक भेटायला आले आहेत. शेतकऱयांची जमीन दाखवून कारखाने उभे केले. कालांतरने ही सर्व मालमत्ता राजकीय नेत्यांची स्वतः इस्टेट व्हायला लागली. काही कारखाने अडचणीत होते, ते कोणीतरी चालविण्यास घेतले. काही ठिकाणी घोटाळे झाले आहेत. तेथील शेतकऱयांना न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे. पारनेर कारखान्याची 150 एकर जमीन पडून आहे. ही कारखान्याला 125 एकर जमिनी दिली होती आणि आता 150 एकर जमिन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जरंडेश्वर प्राथमिक अहवालात 65 कोटीला बेनामीपणे विकत घेण्यात आला आहे. येथील शेतकऱयांच्या न्यायासाठी मी जरंडेश्वर कारखान्यावर जाणार आहे. त्यानंतर बारामतीला जाणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.
राज्यातील साखर कारखानदारीत मोठे घोटाळे असल्याचा आरोप केला. शेतकऱयांच्या मालकीचे साखर कारखाने राजकीय नेत्यांच्या घशात घालून खासगी मालकीचे करण्याची खास पॉवर पध्दत बारामतीच्या पवार परिवाराने निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकरी भिकेला लागले आणि राजकीय नेते कारखानांच्या माध्यमातून करोडपती होत आहेत. त्याचा अभ्यास मी आता सुरु केला असून साखर कारखानदारीतील या भ्रष्टाचाराचा अहवाल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
5 ऑक्टोबरला कोरेगावात जाणार
कोटय़वधी रुपये किंमतीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना केवळ 65 कोटीत बेनामी खासगी मालकीत आणण्याचा उद्योग करणाऱयांची चौकशी झालीच पाहिजे ही कारखान्याच्या माजी संचालक व शेतकऱयांची मागणी आहे. त्याची माहिती घेण्यासाठी मी 5 ऑक्टोबरला कोरेगावला जाणार असून सहकार चळवळ शेतकऱयांसाठी आहे, असे सांगत त्यांनाच भिकेला लावणाऱयांचा पोलखोल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
बारामतीला भेट दिलीच पाहिजे
साखर कारखानदारी ही शेतकरी हिताची असली पाहिजे. मात्र, सहकारच्या नावाखाली शेतकऱयांच्या मालकीचे साखर कारखाने राजकीय नेत्यांच्या घशात घालून ते खासगी करायचे आणि मलिदा खात रहायचे हा अभ्यासाचा विषय झाला आहे. असा पॉवर पॅटर्न निर्माण करणाऱया पवारांच्या बारामतीला मी 5 ऑक्टोबर रोजी भेट देणार असल्याचे सांगत सोमय्या यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळ मोडीत काढण्याचा उद्योग पवार परिवार व राज्यातील सत्ताधारी आघाडीतील मंत्र्यांनी केला असल्याचा आरोप केला.
सहकार चळवळ मोडीत काढण्याचा उद्योग
मी मुंबई विद्यापीठातून फायनान्समधून पीएचडी केलेली आहे. चॉर्टर्ड अकौंटंट मध्ये ऑल इंडिया गोल्ड मेडेलिस्ट आहे. शरद पवार या पॉवरफुल परिवाराने शिकण्यासाठी मला हा वेगळा विषय दिला आहे. मोड ऑफ ऑपरेशन सगळीकडे सेम आहे. हसन मुश्रीफ असो की अजित पवार असो. शरद पवार असो की पारनेर असो. राष्ट्रवादीच्या नेत्याने कारखाना घेतला. त्याचे अंडर व्हॅल्यूएशन करण्यात आले. सर्व ठिकाणी पॉवर फुल पवार परिवाराने दोन चार चांगले व्हॅल्युअर सांभाळले आहेत. ते या संस्थांचे डिव्हॅल्युएशन करत आहेत. या सर्व ठिकाणच्या शेतकऱयांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.
100 कोटी आकडय़ाचा मोह आवरत नाही
मंत्री ईडीवरून गायब होतात, अनिल परबमध्ये हिंमत नाही, ईडीकडे गेले तर त्यांचे सगळे घोटाळे बाहेर येणार आहेत. परब यांनी तुमच्यावर शंभर कोटींचा दावा लावला आहे, या विषयी विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी मिळून परब यांच्या माध्यमातून शंभर कोटींचा दावा माझ्यावर दाखल केला आहे. त्यांना शंभर कोटीच्या आकडय़ाचा मोह आहे, वसुली शंभर कोटींची आणि दावा शंभर कोटींचा त्यांना शंभर कोटींचा मोहच आवरत नाही, अशी टीकाही सोमय्या यांनी केली.