प्रतिनिधी/कोल्हापूर
माजी खासदार किरीट सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर येऊन कागल, मुरगूड आणि घोरपडे कारखान्यावर आपल्या पुर्वनियोजीत दौऱ्यानुसार जाणार आहेत. मी मंगळवारी मुंबईत आहे. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरात स्वागतच करतो. मात्र त्यांनी कायदा, सुव्यवस्था बिघडेल, अशी चुकीची आणि भडक वक्तव्ये टाळावीत असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
किरीट सोमय्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपनंतर मंत्री मुश्रीफ प्रथमच कोल्हापूरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सोमय्या यांनी माझ्यावर आरोप करत अटक करण्याची, जेलमध्ये टाकण्याची भाषा केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना कोल्हापूरात येऊ न देण्याची भूमिका घेतली. पण कार्यकर्त्यांनी अशी कोणतीही भूमिका घेऊ नये असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले होते. मात्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी कायदा, सुव्यवस्थेचा विचार करून त्यांना जिल्हाबंदीचा आदेश लागू केला. आता मंगळवारी सोमय्या कोल्हापूरात येणार आहेत. त्यांचे स्वागत करतो. मात्र त्यांनी सयमांने घ्यायला हवे. बेताल वक्तव्ये करु नयेत. मागील पाच वर्षांच्या काळात भाजपची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी हे काम का केले नाही ? भाजपला पुढील तीन वर्षे सत्ता मिळत नाही हे पाहूनच ही मंडळी सैरभैर झाली आहेत. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर आपण लगेचच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटलो. त्यांना वस्तुस्थिती सांगितली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांच्या वक्तव्यांवरून आक्रमकपणे कोणतेही गैरकृत्य करू नये असे पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
शांत राहण्यासाठी कार्यकर्त्यांची समजूत
सर्व कार्यकर्त्यांची आपण समजूत काढली आहे. शुक्रवारी सकाळपासून हजारो कार्यकर्ते, सर्वसामान्य माणूस, महिला, भेटायला आल्या. त्यांनी विचारपूस केली. हीच माझी ताकद आहे. त्यामुळे मंगळवारी कोणीही अनुचित प्रकार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गालबोट लागेल असा प्रकार करू नये. तसेच सोमय्या यांनीही भान ठेवायला हवे. त्यांनी चिथावणीखोर भाषा वापरू नये. ज्यामुळे जिह्यातील शांतता भंग होईल, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
तर तो कार्यकर्ता माझा नव्हे
मुश्रीफ म्हणाले, किरीट सोमय्या हे ठरलेल्या दौऱयानुसार कोल्हापूरला येत आहेत. त्यांनी कारखाना, आमचे सामाजीक, राजकीय काम पाहवे अशी माझी मनापासून इच्छा आहे. साखर कारखान्याची अंतर्गत तपासणी करायची असेल तर कारखान्याच्यावतीने सीए देतो असेही जाहीर केले होते. पण ते केवळ बाहेरुनच पाहणी करणार आहेत. या दौऱयामध्ये त्यांनी शाहूंच्या जिह्यात भाजप किती आहे याचीही माहिती घ्यावी. ते येतील मात्र त्यावेळी कुणीही कार्यकर्त्यांने कुठलाही अनुचित प्रकार करू नये. जो कोणी असे कृत्य करेल, तो माझा कार्यकर्ता नाही.
सर्वच आरोप तथ्यहीन
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वच आरोपांचे मी खंडन केले आहे. दहा वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या साखर कारखान्याबाबत ते आता आरोप करत आहेत. गेल्यावेळी दोन्हीकडे त्यांचे सरकार होते. त्यावेळी का चौकशी केली नाही. दुसऱया एका कारखान्याबाबतही त्यांनी आरोप केले त्याची माहितीही आपण दिली आहे. ज्या कंपनीने तो कारखाना चालवायला घेतला त्या कंपनीलाही 80 कोटी रूपयांचा तोटा झाला. त्यानंतर त्यांनी हा कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. त्यामुळे सर्वच आरोप तथ्यहीन असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मुंबई बँकेची चौकशी सुरु
माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई बँकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्य्यांची भूमिका रास्त आहे. पण मुंबई बँकेची चौकशी यापूर्वीच सुरु झाली असून लवकरच सत्य बाहेर येईल असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱयांशी बोलणार
किरीट सोमय्या यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर त्यांना जिल्हाबंदी आदेश काढू नये. त्यांना कोल्हापूरात येऊ द्यावे हे सांगण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना भेटणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.