प्रतिनिधी / कोल्हापूर
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे दोन दशकाहून अधिक काळ समाजकारण आणि राजकारणात आहेत. गोरगरिबांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून कोल्हापूरात येण्याचे धाडस करणाऱया किरीट सोमय्यांना कोल्हापूरी हिसका दाखवू असा थेट इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात ईडी कार्यालयाकडेही तक्रार दिली आहे. तरीही सोमय्या यांनी कोल्हापूरात येणारच असे खुले आव्हान दिले आहे. तसेच संताजी घोरपडे साखर कारखान्याची पाहणीदेखील ते करणार आहेत. ही बाब राष्ट्रवादीसह कोल्हापूरच्या जनतेला रुचणारी नसल्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सोमय्यांनी सोमवारी कोल्हापूरात येऊ नये, अन्यथा त्यांना कोल्हापूरी हिसका दाखवला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिला.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार म्हणाले, सोमय्या यांनी संताजी घोरपडे कारखान्यावर जाण्याचे धाडस करू नये. जिह्यातील सर्वांनीच मुश्रीफांवर प्रेम केले आहे. माताभगिनींनी त्यांना बळ आणि आशिर्वाद दिले आहेत. सोमय्या कारखान्यावर गेले आणि अनुचीत प्रकार घडला आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आली तर पुढे काय ? मंत्री मुश्रीफ तब्येत बिघडल्याने दवाखान्यात आहेत. त्यांनी जरी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले तरी लोकांच्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्यांनी दोन पावले मागे घेत कोल्हापूरात येण्याचे टाळावे. बेछूट आरोप करणाऱया सोमय्यांना आमचा विरोध राहणार आहे. पक्षाच्या प्रवक्त्याला झेड सुरक्षा देण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच पाहतोय. केवळ राज्यात सत्ता येत नाही या आकसापोटीच बेछूट आरोप करण्याचे काम करणाऱयाला गोंजारले जात आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही.
राजू लाटकर म्हणाले, तीस चाळीस वर्षे अपार कष्ट उपसून, तपश्चर्या करून चारित्र्य निर्माण करणाऱ्यांच्या चारित्र्यावर कुणीतरी येऊन शिंतोडे उडवणार हे खपवून घेतले जाणार नाही. केंद्रांने सोमय्यांना झेड सुरक्षा दिली आहे. महिन्याला सात ते आठ लाख आणि वर्षाला सव्वा ते दिड कोटी रूपये खर्च कशासाठी ? हा जनतेचाच पैसा आहे. पानसरे, दाभोळकर, आदींची हत्या करणाऱया नराधमांच्या तपासासाठी हा पैसा खर्च करावा. शाहू,फुले आंबेडकरांच्या विचाराला विरोध करण्यासाठी हा कुटील डाव खेळला जात आहे. सोमय्या आहेत कोण, तपासाधिकारी आहेत का ? घोरपडे कारखान्यांवर जाणार असे म्हणून ते चॅलेंज देत आहेत. त्यांनी आपल्या वक्तव्यांना आवर घालावा. अन्यथा कोल्हापूरकर स्वस्थ बसणार नाहीत.
मुंबईचा कुणी भय्या उठून कोल्हापूरला येऊन आमच्या नेतेमंडळीवर कांही बोलणार असेल, तर त्याला कोल्हापूरी हिसका दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा माजी स्थायी समिती सभापती आदील फरास यांनी दिला. महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर म्हणाल्या, मंत्री मुश्रीफ यांना बदनाम करणारे सोमय्या कोल्हापूरात येणार असतील तर महिला राष्ट्रवादीकडून त्यांना तीव्र विरोध करणार असून जशास तसे उत्तर दिले जाईल. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, रमेश पोवार, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.