पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत
मुंबई
भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी संयमाने वागावे. 100 गाडय़ांचा ताफा घेऊन दापोलीकडे गेले आहेत. मात्र तेथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत, असा इशारा गफहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून भाजप नेते किरीट सोमय्या शंभर वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन दापोलीकडे गेले आहेत. तर, सोमय्या यांना रोखण्यासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत. तसेच दापोलीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे देसाई यांनी सोमय्या यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत, असा इशाराच देसाई यांनी दिला आहे.
देसाई म्हणाले की, दापोलीतील रिसॉर्ट आपला नाही, असे अनिल परब यांनी यापूर्वी सांगितले आहे आणि आजही ते तेच सांगत आहेत. सोमय्यांना तो अनिल परब यांचा बेकायदा रिसॉर्ट वाटत असेल तर त्यांनी महसूल विभागाकडे कारवाई करावी. न्यायालयात तक्रार दाखल करावी. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वर्तन करून नये. मग पोलिस त्यांचे काम करतील.
दापोली हे पर्यटनस्थळ आहे. शनिवार-रविवार तेथे मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. स्थानिकांना रोजगार मिळतो. मात्र सोमय्या यांचा ताफा तेथे गेल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे सोमय्यांविरोधात तेथे मोठी नाराजी आहे. सोमय्या माजी खासदार आणि एका मोठय़ा पक्षाचे नेते आहेत. त्यांनी संयमाने वागावे. त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न देसाई यांनी केला.