प्रतिनिधी / कोल्हापूर
भाजपचे नेते किरीट सोमय्या हा भाबडा माणूस आहे. त्यांच्याकडे चुकीची माहीती देऊन मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. याचे खरे सुत्राधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हेच आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. या विरोधात सोमय्या यांच्यावर दोन आठवड्यात शंभर कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. सोमय्यांच्या आरोपानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेला माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर, प्रताप माने, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे आदी मान्यवर उपस्थित होते.
माझ्यावर थेट आरोप करण्याचे चंदकांत पाटील यांच्याकडे धाडस नाही. भाजपमुक्त जिल्हा केला. त्यांना पुण्यातून निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे. त्यातूनच त्यांनी आणि समरजीत घाटगे यांनी सोमय्या यांना चुकीची माहिती देऊन निराधार आरोप केले आहेत. सत्य सत्य असते. माझ्यावर यापूर्वीही असेच खोटेनाटे आरोप झाले आहेत. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचे दावे ठोकले आहेत. आतापर्यंत सहा जणांवर दावे दाखल असून सोमय्या यांच्यावर फौजदारीसह शंभर कोटींचा अबुनुकसनीचा दावा ठोकणार आहे, असा इशारा मंत्री मुश्रीफ यांनी दिला. त्यांच्या पदवीबाबतही शंका वाटते, असे सांगत विधानसभा निवडणुकीपूर्वीही माझ्या घरावर धाडी टाकल्या होत्या. त्यामुध्ये काय सापडले, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, नेतृत्व तयार व्हायला अनेक खस्ता खाव्या लागतात. वीस पंचवीस वर्षे जनतेची सेवा करुन प्रतिमा तयार केली आहे. राज्यात मी 17 वर्षे मंत्री म्हणून काम करत आहे. एकही काळा डाग अद्याप पडू दिला नाही. त्यामुळेच कदाचित चंद्रकांतदादा यांचा सोमय्या यांच्या करवी मला अडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शेतकर्यांच्या पैशातून कारखाना उभा केला
संताजी घोरपडे कारखाना उभा करताना शेतकर्यांनी मला पैसे दिले. मोठ्या कष्टातून कारखाना उभा केला आहे. आतापर्यंत कुणाचा एक रुपयाही बुडवला नाही. सर्वांचे पैसे परत केले आहेत. असे असताना 127 कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप हास्यस्पद आहे. सोमय्या यांनी इतरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोप न करता कोल्हापुरात येऊन वस्तूस्थिती समजून घ्यावी, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांच्यावरही दावा ठोकणार
गृहमंत्री अमित शहा यांच्या मैत्रीतून चंद्रकांत पाटील यांना महसूल, बांधकाम सारखी मोठी खाती मिळाली. त्यांच्या काळात हायब्रीड अन्युलीटीचे रस्ते झाले. या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. या कामांची चौकशी झाली पाहिजे, अशी सातत्याने मागणी करत आलोय. आता त्या विरोधातही दावा ठोकणार आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले तर समरजीत घाटगे यांचा वेळोवेळी समाचार घेऊ, असा इशारा देत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संयम पाळावा, असा दम वजा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.